पांढरा भात खाल्ल्यानं वजन वाढतं असं नाही, तज्ज्ञांकडून जाणून घ्या लठ्ठपणाचं मुख्य कारण काय?
भात खाल्याशिवाय अनेकांना पोट भरल्यासारखं वाटत नाही. म्हणून थोडातरी भात अनेकांना रात्रीच्या जेवणात लागतोच... तर पांढरा भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर तज्ज्ञांकडून जाणून घ्या लठ्ठपणाचं मुख्य कारण काय?

भारतात भात खाणाऱ्यांचं प्रमाण फार मोठं आहे. सर्वात महत्त्वाचं तर अनेक जण पोळी, भाकरी खात नाहीत त्यांना भात लागतोच. त्याशिवाय अनेकांना पोट भरल्यासारखं वाटत नाही. अनेकांना भाताशिवाय जेवण अपूर्ण वाटतं. डाळ, भाज्या, चिकन किंवा इतर पदार्थांसोबत पांढऱ्या भाताची चव सर्वांनाच आवडते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एका प्रश्नावर वारंवार चर्चा होत आहे की, पांढरा भात खाल्ल्याने खरंच वजन वाढते का? अनेक लोकांचा असा विश्वास आहे की लठ्ठपणाचे मुख्य कारण भात आहे… यावर तज्ज्ञांनी विश्वेषण केलं आहे.
कैलाश दीपक हॉस्पिटलच्या सल्लागार आहारतज्ञ पायल दत्त यांनी सांगितल्यानुसार, केवळ पांढरा भात खाल्ल्याने वजन वाढत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकाळ आपल्या शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीजचं सेवन करतं आणि त्यानुसार शारीरिक हालचाल करत नाही, तेव्हा वजन वाढतं. म्हणजेच, वजन वाढीसाठी कोणत्याही एका खाद्यपदार्थाला जबाबदार धरणं योग्य नाही. संतुलित आहार आणि जीवनशैली दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहेत.
त्या पुढे म्हणाल्या, पांढरा तांदूळ कर्बोदकांचा एक उत्तम स्रोत आहे. शरीराला ऊर्जा पुरवण्यासाठी कर्बोदके हे सर्वात महत्त्वाचे पोषक तत्व आहे. त्यामुळे, आहारातून तांदूळ पूर्णपणे वगळण्याची गरज नाही. त्यांनी असं देखील सांगितलं की, पांढऱ्या तांदळात ब्राऊन राईसपेक्षा फायबरचं प्रमाण थोडं कमी असतं कारण त्यावर जास्त प्रक्रिया केली जाते. यामुळे भात खाल्ल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला पुन्हा भूक लागू शकते. पण याचा अर्थ असा नाही की पांढरा भात तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे किंवा तो पूर्णपणे टाळला पाहिजे.
तज्ञांच्या मते, वजन नियंत्रणात तुमच्या संपूर्ण ताटाची सर्वात महत्त्वाची भूमिका असते. जर तुम्ही भातासोबत डाळ, हिरव्या भाज्या, दही, अंडी, मासे किंवा चिकन यांसारखे प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थ खाल्ले, तर तुमचं पोट बराच वेळ भरलेलं राहील आणि तुमच्या रक्तातील साखरही संतुलित राहील. त्या
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा. वजन वाढणे किंवा कमी होणं हे केवळ एका खाद्यपदार्थावर अवलंबून नसतं. तुमचं रोजचं कॅलरी सेवन, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, शारीरिक हालचाल आणि एकूण जीवनशैली या सर्वांची महत्त्वाची भूमिका असते. जर तुम्हाला पांढरा भात खायला आवडत असेल, तर त्याची विनाकारण भीती बाळगण्याची गरज नाही. भाताच्या प्रमाणाची काळजी घ्या, संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या, नियमित व्यायाम करा आणि तुमच्या संपूर्ण आहारावर लक्ष केंद्रित करा. जर तुम्ही निरोगी जीवनशैलीचा अवलंब केला, तर पांढरा भात देखील तुमच्या संतुलित आहाराचा एक महत्त्वाचा भाग बनू शकतो. पण आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या…
