
सध्या राज्यात विधान परिषदेच्या आमदारकीवरुन जोरदार चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत आहे. त्यामुळे ते पुन्हा आमदार होणार की नाही, याबद्दल विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत. त्यातच ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली जात आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधला आहे.
नरेश म्हस्के यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या आमदारकीबद्दल भाष्य केले. उद्धव ठाकरेंनी दिल्लीच्या पुढे टाहो फोडण्यापेक्षा एकदा एकनाथ शिंदे यांना फोन करावा. ते मोठ्या मनाचे नेते आहेत. जर फोन केला तर ते तुमच्या मागे सगळे सोडून उभे राहतील, असा खोचक सल्ला नरेश म्हस्के यांनी दिला आहे.
यावेळी नरेश म्हस्केंनी राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भातही भाष्य केले. राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार फुटणार होते, याची शंका आल्यानेच त्यांनी आपला उमेदवार दिला नाही. जर त्यांनी उमेदवार दिला असता तर तो निवडून आला नसता, असा दावा म्हस्के यांनी केला आहे.
सध्या अधिवेशन काळ असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यस्त आहेत, त्यामुळे ऑपरेशन टायगर सध्या थंड आहे, आगे आगे देखो होता है क्या, असा इशारा नरेश म्हस्के यांनी दिला आहे. यावरुन सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांना विधान परिषद आमदार व्हायचं असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे यांना एक फोन करावा. एकनाथ शिंदे मोठ्या मनाचे नेते आहेत. उद्धव ठाकरेंनी दिल्लीच्या पुढे टाहो फोडण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना फोन करा. एकनाथ शिंदे यांना फोन केला तर ते तुमच्या मागे सगळे सोडून उभे राहतील, असा सल्ला नरेश म्हस्के यांनी दिला आहे.
दरम्यान येत्या मे २०२६ मध्ये विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होत आहेत. मात्र सध्याच्या विधानसभा संख्याबळानुसार महाविकास आघाडीला ९ पैकी केवळ एकच जागा मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ही एकमेव जागा उद्धव ठाकरेंना मिळावी यासाठी ठाकरे गट आग्रही आहे. आता शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या जागेसाठी काय भूमिका घेतात आणि मतविभाजन टाळण्यासाठी कोणती तडजोड केली जाते, यावरच उद्धव ठाकरेंचे भवितव्य अवलंबून असणार आहे.