नागपूर : राज्यातील बळीराजाच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ संपण्याचे नाव घेत नाही. आधीच कोरोना महामारीने बळीराजाचेही कंबरडे मोडले आहे. त्यात आता अवकाळीने संकट आणखी गहिरे केले. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावलेल्या अवकाळी पावसाने बळीराजाची उभी पिके उद्धवस्त केली आहेत. अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळ या संकटांचा सामना केलेल्या बळीराजाची चिंता प्रचंड वाढली आहे. गेल्या वर्षी कोरोना संक्रमणामुळे आर्थिक खाईत गेलेल्या शेतकऱ्यांना यंदा चार पैसे मिळतील अशी आशा असताना त्यात पुन्हा अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (unseasonal rains hit in maharashtra second day)
नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात बुधवारी संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती या पावसाने द्राक्ष, कांदा, हरभरा व गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. बुधवारी संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यात ओझर, निफाड आणि पिंपळगाव बसवंत या भागात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. तर लासलगाव, विंचूरसह परिसरात तुरळक पाऊस झाला मात्र वादळ मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि गहू पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या कांद्याला तीन ते चार हजार रुपये इतका बाजार भाव असताना त्यात आता या अवकाळी पावसाचा फटका बसल्याने कांद्याच्या पिकाचे नुकसान होत बाजार भाव घसरण्याची भीती कांदा उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहे.
निसर्गाच्या लहरीचा तडाखा राज्यातील शेतकऱ्याला बसत असून त्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. गेल्या महिन्यातही अवकाळी पावसाने राज्याला झोडपले होते. आता पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर गारपिटीचाही तडाखा बसला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.
मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. पहाटेपासून सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू आहे. परभणी, नांदेड, उस्मानाबादमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पडणाऱ्या या पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे गहू, हरभरा,ज्वारी पिकं आडवी झाली आहेत. आंब्याचा मोहोर गळून पडतोय. तर रब्बी हंगामातील सर्वच पिकांना या पावसाचा फटका बसणार आहे. अवेळी पडणाऱ्या या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव सिल्लोड आणि कन्नड तालुक्यात गारपीट, वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. अवकाळी पावसामुळे तीन ते चार तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे तूर, हरभरा, गहू, ज्वारी, भाजीपाला आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काही ठिकाणी द्राक्ष घडात पाणी साचल्याने द्राक्ष पिकाचे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात काल अवकाळी पावसानं दाणादाण उडवून दिली. कोकणात गारपिटीचा पाऊस पडेल हा हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा करताना पाहायला दिसला. रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, चिपळूण या तालुक्यात अनेक ठिकाणी गारपिटीसह पाऊस झालाय. तळकोकणही अवकाळी पावसाने हजेरी लावली. चिपळूण तालुक्यातील काही भागात गारपिटीसह पाऊस झाला. लांजा शहरामध्येही मुसळधार पाऊस झाला. जवळपास दीड तास कोसळलेल्या पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.
अमरावती जिल्ह्यात चिखलदरा तालुक्यात काल सायंकाळी मुसळधार पाऊस पडला. मेळघाटात सर्वदूर पाऊस कोसळत असताना खंडूखेडा गावात प्रचंड गारपीट झाली. या गारपीटीनंतर परिसराला काश्मीरचे स्वरूप प्राप्त झाले होते. मात्र, या गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाऊस आणि बर्फ पडल्याने मेळघाटातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या हातचे पिक गेले. गहू, चणा पूर्णतः खराब झाले. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून मेळघाटातील जंगलांमध्ये असणाऱ्या सागवान या वृक्षासह सर्वच झाडांच्या पान झाडीला सुरुवात होते. जंगल पूर्णतः ओस पडायला लागत असताना अचानक बर्फ पडल्याने वृक्ष, डोंगरावर, खडकावर, दरीत सर्वत्र पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर निसर्गाने ओढली असल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
अवकाळी पावसामुळे रब्बीतील हरभरा आणि गव्हाचं मोठं नुकसान झालं. गव्हाचं पिक शेतात झोपलं असून, कापणी केलेला हरभरा पावसात भिजलाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. याचा आढावा घेतला, आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी… (unseasonal rains hit in maharashtra second day)