विधानपरिषदच्या जागावाटपाचा तिढा सुटता सुटेना, देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले आम्ही…
विधानपरिषद निवडणूक २०२६ साठी महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला ठरवण्यासाठी चर्चा सुरू असून लवकरच एकत्र बसून मार्ग काढू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या १७ जागांसाठी विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार चर्चा सुरु आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीबद्दल अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे विधान केले आहे. “विधानपरिषदेच्या जागावाटपाबाबत आमची चर्चा सुरू असून आम्ही सर्व पक्ष एकत्र बसून यावर निश्चितच मार्ग काढू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईतील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन येथील नूतनीकृत इमारतीच्या लोकार्पण सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, शिक्षण मंत्री दादा भुसे आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीबद्दल भाष्य केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
विधानपरिषदेच्या निवडणुकांबद्दल आमची सविस्तर चर्चा सुरू आहे. साधारणपणे शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगर या दोन जागांवर चर्चा सुरू आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत पुण्याच्या जागेवरून चर्चा सुरू आहे. आम्ही एकत्र बसून यावर निश्चित मार्ग काढू. अजून अंतिम मार्ग निघालेला नाही, पण यातून निश्चितच सकारात्मक मार्ग निघेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महायुतीच्या फॉर्म्युल्यात ऐनवेळी बदल?
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीच्या अंतर्गत जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. यापूर्वी भाजप १२, शिवसेना ३ आणि राष्ट्रवादी २ जागांवर लढणार अशी चर्चा होती. मात्र, आता नवीन समीकरणानुसार भाजप १२, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा मिळण्याची शक्यता आहे.
यात शिवसेना ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी-हिंगोली या पारंपरिक जागांवर दावा करणार असल्याचे बोललं जात आहे. तर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गची महत्त्वाची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाऊ शकते. तसेच पुण्यासह इतर महत्त्वाच्या जागांवर भाजपने आपला दावा कायम ठेवला आहे. या संभाव्य फॉर्म्युल्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी आज किंवा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
दरम्यान ठाणे, पुणे, नाशिक, सोलापूर, अहमदनगर, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, भंडारा-गोंदिया आणि अमरावती यांसारख्या प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या रणधुमाळीकडे लागले आहे.