पुण्यात हल्ला झाल्यानंतर विद्यानंद बापट यांची मोठी घोषणा, मारहाणीनंतर पहिल्यांदा आले समोर
पुण्यात हल्ला झाल्यानंतर विद्यानंद बापट यांची मोठी घोषणा केली आहे. मारहाणीनंतर पहिल्यांदा समोर येऊन बापट यांनी भूमिका स्पष्ट केली.

सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट हे पुण्यातील हल्ल्यानंतर राज्यभरात अनेकांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. विद्यानंद बापट हे करत असलेल्या डिजे बंदीच्या मागणीची सर्वत्र चर्चा होत आहे. परंतु काल विद्यानंद बापट यांना गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष संतोष चव्हाण याने मारहाण केली. या मारहाणीनंतर पोलिसांनी त्यांना 24 तास पोलीस सुरक्षा देणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर रविवारी त्यांच्या हल्ल्याच्या विरोधात काही नागरिकांकडून मोर्चा काढला जाणार आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर आता या मागणीसाठी संघटनात्मक स्वरुप द्यायचं आहे, अशी घोषणा बापट यांनी केली. त्यावर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यात मारहाण झाल्यानंतर विद्यानंद बापट पहिल्यांदा माध्यमांसमोर आले. विद्यानंद बापट म्हणाले, ‘मला माझं व्यक्तिमहत्व वाढवायचं नाही. माझे मुद्दे पुढे नेत असेल, तर ते मला महत्वाचं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याविषयी म्हटलं आहे. व्यक्तिमहत्व वाढवणे घातक असते. तुम्ही व्यक्तिगत पातळीवर करत असाल, तर तुमचं अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणून मान्य करेल. परंतु मी स्वत: प्रोत्साहन देणार नाही’.
काही जण भावना दुखावत असल्याचा आरोप करत आहेत, यावर बापट म्हणाले, भावना म्हणजे हात, पाय, छाती दुखण्यासारखा भाग नाही. हा हास्यास्पद कांगावा आहे. युनायटेड नेशनने सर्व देशांना सांगितले की, असे कायदे तुमच्या देशात असतील, तर काढून टाकावेत. भावना ही दुखायची गोष्ट नाही. ते डोके नाही. तो फक्त कांगावा आहे. टिळकांच्या काळात ते सार्वजनिक गणेशोत्सव करत होते. त्याकाळी न्यायमूर्ती रानडे होते. ते म्हणत होते की, तुम्ही हा गणपती पुन्हा घरात नेऊन ठेवा. आगरकर देखील बुद्धिप्रामाण्यवादी होते’.
‘ध्वनी प्रदुषणासहित नदी प्रदुषण देखील होते. पंतप्रधान मोदी सांगत आहेत की, पीओपीच्या मूर्ती बसवू नका. त्याऐवजी शाडूच्या मूर्ती बसवा. त्यांचं कधी ऐकणार आहात. ध्वनीप्रदुषणात बोलायची सोय होत नाही, त्यामुळे त्यावर अधिक भर दिला आहे. माझ्या घरी पारंपरिक पद्धतीनुसार गणपती बसवला जायचा. त्याने काही फरक पडत नाही. नास्तिकता ही वयोमानानुसार झाली. त्याने काही फरक पडत नाही. आताची भूमिका महत्त्वाची आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.