शेताला आले तलावाचे स्वरूप; पिके पाण्याखाली, कसे निघणार उत्पादन?

मागील पाच दिवसांपासून तालुक्यात सुरु असलेल्या पावसाचा हाहाकार वाढला आहे. सलग तिसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस बरसल्याने धरणे तुडूंब भरलीत.

शेताला आले तलावाचे स्वरूप; पिके पाण्याखाली, कसे निघणार उत्पादन?
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jul 25, 2023 | 5:06 PM

वाशिम : वाशिमच्या रिसोड तालुक्यातील केनवड, गणेशपूर, जोगेश्वरी, कोयाळी जाधव, नेतंसा, नावली, जांब, गोवर्धन, कळम गव्हाणसह अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस काल सायंकाळी पडला. या पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालंय. शेकडो हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, कपाशी, तूर पिके पाण्याखाली गेलीत. काही गावामध्ये शेतीसह सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही ठिकाणी जमिनी खरडून गेल्यात. त्यामुळे शेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रिसोड तालुक्यात हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

धरणे तुडूंब भरली

वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये काल सायंकाळपासून संततधार आणि मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश नदी, नाल्यांना पूर आला. अनेक गावं संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेलीत. शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. मागील पाच दिवसांपासून तालुक्यात सुरु असलेल्या पावसाचा हाहाकार वाढला आहे. सलग तिसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस बरसल्याने धरणे तुडूंब भरलीत. धरणाच्या पाण्यामुळे तालुक्यातील नदी, नाल्यांना पूर आल्याने अनेक गावे बाधित झालीत.

जमिनी खरडल्या

केनवड, गणेशपूर, कुकसा, जोगेश्वरी, कोयाळी, जांब, कळमगव्हान, नंधाना, गोवर्धन, मांगुळ, नेतन्सा या गावांच्या नदीच्या पाणी पत्रात वाढ झाली. काही गावांचा संपर्क तुटला. नदी, नाल्यांच्या पाण्यात वाढ झाल्याने पाणी शेतात घुसले. पिकांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यातील पाण्याचा विसर्ग लगतच्या नाल्यात झाला. केनवड गावाच्या काही नदीकाठच्या भागात पाणी शिरले. बहुतांश जमिनी खरडून गेल्या. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

नदी, नाल्यांना पूर

रिसोड तालुक्यात खरीप हंगामातील पेरण्या उशिराने सुरू झाल्या. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील अल्पशा पावसाच्या भरोवशावर शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. त्यानंतर पावसाने वेळोवेळी हजेरी लावली. पिके अंकुरल्याने शेतकरी सुखावला गेला. यानंतर काल सायंकाळी मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला.

नुकसानभरपाईची मागणी

शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. जोरदार पावसामुळे नदीकाठच्या गावात आणि शेतात पाणी साचल्याने शेतांना तलावांची स्वरूप आले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी. सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी विठ्ठल खराटे, संदीप गोळे, विकास खराटे, आणि संजय गोळे यांनी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us