शेतीचे काम आटोपून परतत होते; तीनजण बैलगाडीसह वाहून गेले
येवता बंदी परिसरातील नाल्याला पूर आला. या पुरात शेतीचे काम आटोपून घरी परतणारे तीन जण बैलगाडीसह वाहून गेले.
विठ्ठल देशमुख, प्रतिनिधी, वाशिम : वाशिमच्या कारंजा तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. येवता बंदी परिसरातील नाल्याला पूर आला. या पुरात शेतीचे काम आटोपून घरी परतणारे तीन जण बैलगाडीसह वाहून गेले. त्यापैकी विष्णू महादेव हागोने या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. याघटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बैल गाडीमध्ये मृत शेतकऱ्यासोबत कार्तिक हागोने (वय 18) आणि गणेश कापसे (वय 14) हे दोघे होते. या दोघांना सुदैवाने वाचवण्यात यश आले. मात्र विष्णू हागोने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वैजापूर तालुक्यात पावसाने हाहाकार
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील आज सायंकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार उडाला. तालुक्यातील संजरपुरवाडी, परसोडा, करंजगाव, सिध्दापुरवाडी येथे ढगफुटीसारखा पाऊस झाला. पेरणी केलेले बियाण्यांसह जमिनीही वाहून गेल्याचे वृत्त हाती येत आहे. तर संजरपुरवाडी येथे १० ते १५ घरे ही पूर्ण पाण्यात गेली. चार ते पाच घर पडून नुकसान झाले आसल्याची माहिती हाती येत आहे. तर बोरसर येथील बोर नदीला पूर आल्याने काही घरात आणि जनावरांच्या गोठ्यात पाणी घुसले.
चंद्रपुरात शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
चंद्रपुरात अखेर पाऊस बरसला आहे. सुमारे वीस दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात केवळ सात टक्के एवढाच पाऊस झाला. धान प्रमुख पिकांसाठी आवश्यक असलेला पाऊस रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती.
याशिवाय वातावरणात दमटपणा वाढल्याने दिवसभर रखरखते ऊन आणि संध्याकाळी दमट हवामानाने नागरिक त्रासले होते. मात्र दीर्घ प्रतीक्षेनंतर का होईना, चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस बरसल्याने आता शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पावसाचे आगमन झाले. त्यामुळे पेरण्यांना आता वेग येणार आहे.
बुलढाण्यात होणार साडेसात लाख हेक्टरवर पेरणी
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून लांबलेला पाऊस अखेर बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाला आहे. मुंबई पुण्यानंतर आज बुलढाणा, खामगाव, चिखली, लोणारसह इतर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात खरिपासाठी तब्बल साडेसात लाख हेक्टरवर पेरणी होणार आहे. मात्र बुलढाण्यात जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र बुलढाण्यात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा दिला आहे. लोणार तालुक्यात भुमाराला येथील नदीला मोठा पूर आलाय.