तर सत्तेवर लाथ मारू, शिवसेनेचा महापालिकेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
मुंबई महापालिकेतून मोठी बामती समोर आली आहे. पालिकेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी : मुंबई महापालिकेतून मोठी बातमी समोर आली आहे. पालिकेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. मुंबई महापालिकेच्या अभय योजनेत कथित भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी स्थायी समितीच्या बैठकीतून सभात्याग केला. भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत स्थायी समितीच्या बैठकीत सहभागी होणार नसल्याचा इशारा घोले यांनी दिला आहे.
अभय योजनेच्या नावाखाली पैशांची उकळण
अभय योजनेच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने योजना लागू केली होती. मात्र, या योजनेच्या नावाखाली काही अधिकारी नागरिकांकडून पैसे मागत असल्याचा गंभीर आरोप अमेय घोले यांनी केला. ‘कॉलनी ऑफिसर लोकांकडून पाच-पाच लाख रुपये मागत आहेत. हे आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही,’ असा दावा त्यांनी केला.
तर आम्ही सत्तेवर लाथ मारू
या प्रकरणात घोले यांनी बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. संबंधित अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत स्थायी समितीच्या बैठकीत सहभागी न होण्याची भूमिका त्यांनी घेतली. आम्ही सभात्याग करू, सत्तेवर लाथ मारू; पण अधिकाऱ्यांवर कारवाई होऊन गरिबांना न्याय मिळेपर्यंत या बैठकीचा भाग होणार नाही, असे घोले यांनी स्पष्ट केले.
अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे
अभय योजनेच्या नावाखाली एका फाईलमागे पाच ते दहा लाख रुपये घेतले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जोपर्यंत पिगी बँकेत पैसे येत नाहीत, तोपर्यंत काही होत नाही, असे म्हणत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा हा इशारा मानला जात आहे का, याबाबत घोले यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळणे हेच महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. शिवसैनिक कधीही अन्याय सहन करणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली.
अंतर्गत मतभेद समोर
महापालिकेतील सुधार समितीच्या बैठकीबाबत विचारले असता, संबंधित विषय मराठी कुटुंबांच्या इमारतीशी संबंधित होता, मात्र आपण त्या बैठकीचा भाग नसल्याने त्याबाबत अधिक माहिती नसल्याचे घोले यांनी सांगितले. अभय योजनेतील कथित गैरप्रकारांच्या आरोपांमुळे महापालिकेतील सत्ताधारी गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आले असून, या प्रकरणात प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.
