पश्चिम बंगालमध्ये रेकॉर्डब्रेक 91 टक्के मतदान, भाजपाचं नशीब उजळणार का? बारामतीमध्ये किती मतदान?

पश्चिम बंगाल, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. यावेळी या दोन्ही राज्यांत विक्रमी मतदान झाले आहे. बारामती, राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदानाची प्रक्रिया पार पडली.

पश्चिम बंगालमध्ये रेकॉर्डब्रेक 91 टक्के मतदान, भाजपाचं नशीब उजळणार का? बारामतीमध्ये किती मतदान?
west bengal
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 23, 2026 | 9:08 PM

West Bengal Tamil Nadu State Election Voting Percentage : राज्यात बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघांसाठीच्या पोटनिवडणुकीत आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. सोबतच आज (23 एप्रिल) पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील आणि तामिळनाडूतील मतदानही पार पडले. या सर्व निवडणुकांचा निकाल 4 मे रोजी लागणार आहे. राज्यातील दोन जागांसाठीची पोटनिवडणूक तसेच पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील निवडणूक ही अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये तर विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिष्ठाच पणाला लागली आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान बंगालमध्ये काही अपवाद वगळता मतदान सुरळीत पार पडले. विशेष म्हणजे या पहिल्याच टप्प्यात मतदानाचे सर्व रेकॉर्ड्स यावेळी मोडीत निघाले.

कोणत्या राज्यात किती मतदान?

पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात मतदानाचे सर्व रेकॉर्ड तुटले आहेत. या पहिल्या टप्प्यात विक्रमी 91.35 टक्के मतदान झाले. या पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांतील 152 जागांसाठी निवडणूक झाली होती. या राज्यात तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यात टक्कर आहे. त्यामुळे विक्रमी मतदान झाल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तामिळाडूमध्येही दिवसाअखेर 82.24 टक्के मतदान झाले.

बारामती, राहुरीत किती टक्के मतदान

आतापर्यंतच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 50.74 टक्के मतदान झाले. बारामती विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.44 टक्के मतदान झाले. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्याला यश आले नाही. बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सत्ताधारी तसेच विरोधक अशा सर्वांनीच पाठिंबा दिला आहे. त्याचा या निवडणुकीत विजय निश्चित मानला जात आहे.

तरीदेखील येत्या 4 मे रोजी नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पश्चिम बंगालमधील सत्ता कोणाच्या हातात जाणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

Follow Us