Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, तरी आंदोलन सुरूच राहणार, दीपके यांच्या आणखी 2 मोठ्या मागण्या!
Abhijeet Dipke And CJP : धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर आता कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्याचं बोललं जातंय. अभिजित दीपके यांनी आणखी दोन मोठ्या मागण्या केल्या आहेत.

Dharmendra Pradhan Resign : दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा अखेर दिला आहे. नीट पेपरफुटीमुळे धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी भूमिका सीजेपीची होती. काहीही झालं तरी आम्ही मागे हटणार नाही, असं सीजेपीने सांगितलं होतं. दरम्यान, प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता जंतर-मंतरवरील आंदोलन संपले आहे, अस मानले जात होते. परंतु सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी समोर येत आमचे दिल्लीतील आंदोलन सुरूच राहील, असे सांगितले आहे. त्यांनी केंद्र सरकारकडे दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
तरुणांच्या ताकदीपुढे सरकारला झुकावे लागले
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर अभिजित दीपके यांनी जंतर मंतरवरील उपस्थित हजारो तरुण आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सीजेपीच्या पुढच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. मोदी सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत, असे म्हटले जात होते. परंतु तरुणांच्या ताकदीपुढे सरकारला झुकावे लागले. आपण करून दाखवले, असे म्हणत सीजेपीच्या आंदोलनला यश मिळाले, असे दीपके म्हणाले.
दीपके यांनी आणखी कोणत्या मागण्या केल्या?
तसेच, आता राजीनामा झाला म्हणजे आंदोलन संपले, असे गृहित धरले जाईल. परंतु आम्ही कॉकरोच आहोत. आम्ही लगेच मैदान सोडणार नाही. आमच्या आणखी दोन मागण्या आहेत, असंही ते म्हणाले. ज्या विद्यार्थींनी आत्महत्या केल्या त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाना एक कोटीची आर्थिक मदत. दिली पाहिजे. गुंडगिरी करणाऱ्या पोलिसांनी जो लाढीचार्ज केला होता, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. डीसीपी संदीप लांबा, एसीपी अजय शर्मा, सचिन शर्मा यांनी अमित शाहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून तरुणांवर लाठीचार्ज केला. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. 20 जुलैनंतर ज्या-ज्या विद्यार्थ्यांवर कारवाई झाली, गुन्हे दाखल झाले ते सर्व मागे घेतले पाहिजेत, अशा मागण्या त्यांनी केल्या. दरम्यान, आता दीपके यांच्या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
