MLC Election:विधानपरिषदेचं मतांचं काय आहे गणित?, काँग्रेस का करतेय शिवसेनेच्या अपक्षांना फोनाफोनी?, भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्यात तीव्र संघर्ष

| Updated on: Jun 17, 2022 | 10:26 PM

राज्यसभेच्या निवडणुकीत 123 मते मिळवत भाजपाने तीन राज्यसभेच्या जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपाचा आत्मविश्वास सध्या दुणावलेला दिसतो आहे. विधान परिषदेसाठी भाजपाने सदाभाऊंनाही रिंगणात आधी उतरवले होते, नंतर त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आलीये. मात्र तरीही भाजपाला अपेक्षेपेक्षा जास्त मते हवी असल्याचे सध्या तरी दिसते आहे. अशा स्थितीत भाजपा पाचवी जागा जिंकणार का, असा प्रश्न आहे.

MLC Election:विधानपरिषदेचं मतांचं काय आहे गणित?, काँग्रेस का करतेय शिवसेनेच्या अपक्षांना फोनाफोनी?, भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्यात तीव्र संघर्ष
Mathematics of MLC
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई – राज्यसभा निवडणुकांप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीसाठी (MLC Election)सध्या महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये चुरस पाहायला मिळते आहे. राज्यसभेत जी चिंता शिवसेनेला (Shivsena)होती, ती चिंता विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला (Congress)लागली आहे. काँग्रेसने भाई जगताप यांना अतिरिक्त उमेदवारी दिली आहे तर भाजपाने प्रसाद लाड यांना सहावा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. त्यामुळेच आता काँग्रेस महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या सहयोगी आमदारांना फोन करुन त्यांना आपल्याकडे जोडण्याच्या प्रयत्नात आहे.

निवडून येण्यासाठी किती मतांची गरज

विधान परिषद निवडणूक जिंकायची असेल तर प्रत्येक उमेदवाराला 27 मतांची गरज आहे. तसेच यात दुसऱ्या क्रमांकाची मतेही महत्त्वाची आहेत. 55 आमदार असलेल्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मानण्यात येतो आहे. शिवसेनेने आमषा पाडवी आणि सचिन अहिर यांना उमेदवारी दिली आहे. त्याव्यतिरिक्त शिवसेनेकडे बच्चू कडू यांच्या प्रहारचे दोन आमदार, शंकरराव गडाख, आशिष जैस्वाल, गीता जैन, चंद्रकांत पाटील अशी काही अतिरिक्त मते आहेत. आता या मतांवर काँग्रेसचा डोळा आहे. बच्चू कडू, शंकरराव गडाख हे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपदावर असल्याने त्यांच्या मतांचा निर्णय शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा असलेल्या सहा अपक्ष आमदारांना फोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. अशा स्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आघाडीतील शिवसेनाच टार्गेट होताना दिसते आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार आणि सहयोगी आमदारांची मते या निवडणुकीत किती स्थिर राहतील याबाबत शंका उपस्थित करण्यात येते आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसही चिंतेत?

राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ आहे 53, मात्र आता अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना विधान परिषदेत मतदान करता येणार नाही, असे मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ आता51  झाले आहे. राष्ट्रवादीने रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली आहे. हे दोन उमेदवार जिंकून आणण्यााठी राष्ट्रवादीला 54 मतांची गरज आहे. संजय मामा शिंदे, राजेंद्र येड्रावकर, देवेंद्र भुयार यांच्यासह काही जण अजित पवारांच्या संपर्कात असल्याने, राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून येण्यातही अडचण दिसत नाहीये. मात्र एकनाथ खडसे यांना पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. भाजपाने अशी काही खेळी केली तर राष्ट्रवादीची नाचक्की होईल, त्यामुळेच अजित पवारांनी या निवडणुकीत लक्ष घातल्याचे मानण्यात येते आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसला 10 मतांची गरज

काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप असे दोन उमेदवार दिले आहेत, काँग्रेसची मते आहेत 44. दोन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी काँग्रेसला 10 मतांची गरज आहे. एमआयएमचे एक मत आता हंडोरेंना नक्की झआले आहे, मात्र अजून एका मताचा निर्णय एमआयएमने घेतलेला नाही. त्यामुळे अजून काँग्रेसला 9 मते हवी आहेत. या नऊ मतांसाठी भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे शिवसेनेच्या आणि भाजपा समर्थित आमदारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. सपाचे दोन आमदार, बविआची दोन किंवा तीन मते आणि अपक्षांची काही मते यावर काँग्रेसच्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून आहे.

भाजपाचं संख्याबळ

भाजपाने उमा खापरे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे या पाच जणांना रिंगणात उरवले आहे. भाजपाचे संख्याबळ आहे. 106 आणि 7 अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे, म्हणजेच त्यांचे संख्याबळ आहे 113 . प्रत्यक्षात विजयासाठी भाजपाला गरज आहे 135 मतांची. म्हणजे संख्याबळानुसार भाजपाला 22 जादा मतांची गरज आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना मिळून 123 मते पडली होती. हा आकाड स्थिर राहील असा विचार केला तरी, 12 मते भाजपाला जास्त हवी आहेत.

भाजपाला अति आत्मविश्वास नडणार तर नाही?

राज्यसभेच्या निवडणुकीत 123 मते मिळवत भाजपाने तीन राज्यसभेच्या जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपाचा आत्मविश्वास सध्या दुणावलेला दिसतो आहे. विधान परिषदेसाठी भाजपाने सदाभाऊंनाही रिंगणात आधी उतरवले होते, नंतर त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आलीये. मात्र तरीही भाजपाला अपेक्षेपेक्षा जास्त मते हवी असल्याचे सध्या तरी दिसते आहे. अशा स्थितीत भाजपा पाचवी जागा जिंकणार का, असा प्रश्न आहे. भाजपाचा पराभव करण्यासाठी स्वता उपमुख्यमंत्री अजित पवार रिंगणात उतरले आहेत, अशा स्थितीत भाजपाला अति आत्मविश्वास नडणार तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे.