
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात आता जास्त बोलणार नाही असं शरद पवार पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलय. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांसोबत दादांच्या विलिनीकरणाबाबत काही बैठका झाल्याची आपल्याला माहिती नाही असं सांगतात. तसच विलिनीकरण होणार असेल, तर शरद पवार गटाला भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये यावं लागेल असं सुद्धा अप्रत्यक्षपणे सांगण्यात आलय. या पार्श्वभूमीवर आता नवीन माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रेदशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची कल्पना होती. अजितदादांनीच त्यांना तशी कल्पना दिली होती असं समोर आलय.
16 जानेवारीला अजित पवार यांच्या मुंबईतील प्रमकोट या निवासस्थांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली. त्यावेळी सुनील तटकरे तिथे होते अशी माहिती आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात 10 ते 12 बैठका झाल्या. शरद पवार पक्षाच्या नेत्यांसोबत अजितदादांनी चर्चा केली होती. या बैठकीचा सिलसिला नोव्हेंबर महिन्यापासून सुरु झालेला अशी माहिती आहे.
विलिनीकरणाची शेवटची बैठक कधी झालेली?
जानेवारी महिन्यात 16 तारखेला शेवटची बैठक झाली. या बैठकीला सुनील तटकरे उपस्थित होते. अजितदादांनी तटकरेंना विलिनीकरणाची कल्पना दिली होती. सुनील तटकरे सकारात्मक होते अशी माहिती आहे. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलिनीकरणाच्या चर्चांबाबत आपल्याला फार माहिती नाही असं सांगत असतात. त्यामुळे ही नवी माहिती महत्वपूर्ण आहे.
राष्ट्रवादी महायुतीसोबत सरकारमध्ये
अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीतील नेते विलिनीकरणासाठी फारसे उत्साही दिसत नाहीत. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये सुनेत्रा पवार यांच्यानंतर प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हे प्रमुख नेते आहेत. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीसोबत सरकारमध्ये आहे. तेच शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात महाविकास आघाडी मध्ये आहे. अजितदादांच्या अकाली निधनाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकारण ढवळून निघालं.