सर्वात जास्त राग कुणाचा येतो? राज ठाकरे की नारायण राणे? आदित्य ठाकरे म्हणतात…
सर्वात जास्त राग कुणाचा येतो? राज ठाकरे की नारायण राणे? असा प्रश्न प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्ते यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला.
संगमनेर (अहमदनगर) : सर्वात जास्त राग कुणाचा येतो? राज ठाकरे की नारायण राणे? असा प्रश्न प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्ते यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना विचारला. या प्रश्नानंतर सर्वांच्या नजरा आदित्य ठाकरे यांच्याकडे खिळल्या. मात्र, आदित्य ठाकरेंनी मोठ्या हुशारीने उत्तर देत आपली सुटका करुन घेतली. त्यांच्या उत्तरानंतर प्रेक्षकांमध्ये जोरदार टाळ्यांचा गजर ऐकू आला (Aaditya Thackeray).
संगमनेरच्या अमृतवाहिनी महाविद्यालयात ‘संवाद तरुणाईशी’नावाचा युवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्ते यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्धकी यांना बोलतं केलं.
आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय उत्तर दिलं?
“तुम्ही माझ्या वडिलांच्या मुंबई महापालिकांच्या निवडणुकांनंतरच्या मुलाखती बघितल्या असतील किंवा विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर बघितलं असेल. प्रत्येक पत्रकार परिषदेत त्यांना अशाप्रकारचा प्रश्न विचारला गेला. अजूनही असे प्रश्न विचारले जातात. तेव्हा ते म्हणतात की, सबको माफ कर दिया. माफ करण्याइतपत मी मोठा नाही. नेहमी काहीतरी घडामोडी घडतच असतात. म्हणून मी नेहमीच लक्षात ठेवलेलं असतं की राग कुणाचाही धरायचा नसतो.”
“जेव्हा आपण लोकांची मदत करण्याची शपथ घेतो तेव्हा कोणताही भेदभाव न करता आपण मदत करत असतो आणि लोकांची सेवा करत असतो. राग, द्वेष मनात धरुन तुम्ही कुठे जाऊ शकत नाहीत. मग ते तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागतं. तुमच्या अंगाच्या हालचालींवरुन दिसायला लागतं. तुमच्या डोळ्यांमध्ये तो राग दिसायला लागतो. मग तुम्ही डोळे चुकवायला बघतात. तुम्ही जे काही कराल ते स्वच्छ मनाने करा. तुमच्यासोबत त्या मानसाने कसंही वागलं असेल तुमचं मन साफ ठेवा. जगात घाबरण्याची गरज नाही.”