इकडे ठाकरेंचा एकजुटीचा मंत्र, तिकडे पदाधिकाऱ्यांचे धडाधड राजीनामे; यवतमाळमध्ये राजकीय भूकंप

उद्धव ठाकरेंनी यवतमाळात एकजुटीचा मंत्र दिल्यानंतरही, त्यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 15 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. यात तालुकाप्रमुख, युवासेना जिल्हा प्रमुख, महिला आघाडी प्रमुख यांचा समावेश आहे. अंतर्गत राजकारण आणि शिंदे गटाच्या नेतृत्वाला पसंती देत हे पदाधिकारी शिंदे गटात जात असल्याचे समोर आले आहे.

इकडे ठाकरेंचा एकजुटीचा मंत्र, तिकडे पदाधिकाऱ्यांचे धडाधड राजीनामे; यवतमाळमध्ये राजकीय भूकंप
उद्धव ठाकरे
| Updated on: Jun 29, 2026 | 11:01 AM

सहा खासदार फुटल्यानंतर पक्ष सावरण्यासाठी आणि संघटना मजबूत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी सहाही खासदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून उद्धव ठाकरे विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे खासदाराने गद्दारी केल्याबद्दल माफीही मागत आहेत. तसेच पुन्हा एकदा नव्याने उभं राहून संघटना मजबूत ठेवण्याचा मंत्रही देत आहेत. उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमध्ये येऊन हाच मंत्र दिला. पण उद्धव ठाकरे जाताच पक्षात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. एक दोन नव्हे तर 15 पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यवतमाळ तालुका प्रमुखासह 15 जणांनी राजीनामे दिले आहेत. तालुकाप्रमुख गजानन पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख अमोल धोपेकर, महिला आघाडी प्रमुख अंजली गिरी, तालुका प्रमुख युवासेना अक्षय ठाकरे आदी पदाधिकाऱ्यांनी पक्ष आणि पदाचा राजीनामा दिला आहे. यवतमाळमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच राजीनामा दिल्याने ठाकरे गटावर मोठं संकट निर्माण झालं आहे.

शिंदे गटात जाणार

दरम्यान, हे सर्व पदाधिकारी शिंदे गटाची वाट धरणार असल्याचं समोर आलं आहे. एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व सर्वमान्य असून स्थानिक खासदारांच्या पाठी आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत, असं या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. अंतर्गत हेवेदावे आणि राजकारणाला कंटाळून या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचंही समोर आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमध्ये मोठी सभा घेतली होती. यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून संघटना मजबूत ठेवण्याच्या कामाला लागण्याचा आदेश दिला होता. तसेच कुणीही निराश होऊ नका, खचून जाऊ नका. अशी संकटे येतात आणि जातात. आपण मजबूतीने काम केलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र, उद्धव ठाकरेंची पाठ वळताच जिल्ह्यात राजकीय भूकंप आला आहे.

आगे आगे देखिए…

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी ऑपरेशन टायगरवर सूचक विधान केलं आहे. ऑपरेशन टायगर बाबत बघूया पुढे काय होते. आगे आगे देखिए होता है क्या? तुम्हाला लवकरच त्या संदर्भात कळेल. एकनाथ शिंदे राजकारणातील बेस्ट सर्जन आहेत. त्यांच्या हातून राजकारणातील लोकांना आपले ऑपरेशन करून घेणे आवडते. अधिवेशन अजून संपलेले नाही, सुरू आहे, असं सूचक विधान कृपाल तुमाने यांनी केलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us