
राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणूकीसाठी मतदान सुरू आहे. काही मतदारांनी बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचा आरोप केला आहे. याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. अशातच आता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत यावर उत्तर दिलं आहे. आम्ही गेल्या 15 वर्षांपासून हीच शाई वापरत आहोत. एकदा शाई लावली आणि ती सुकली की ती निघू शकत नाही असं आयोगाने स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मतदान सुरु असतानाच राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, बोटाला मार्करद्वारे लावत असलेली शाई एकदा सुकली की ती निघू शकत नाही. ज्या लोकांनी शाई पुसण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी काय वापरलं हे आम्हाला माहिती नाही. समाजात फेक नरेटिव्ह पसरवल्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर पत्रकारांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मार्करचा वापर करणार का? असा प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना वाघमारे यांनी, ‘मार्कर पेनचा अनुभव पाहता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही इंडिलेबल इंकचा वापर करणार आहोत.’ अशी घोषणा केली आहे. त्यामुळे आता 5 फेब्रुवारीला मार्करऐवजी काडीने बोटाला शाई लावली जाणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा करताना निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद 50 टक्केपेक्षा कमी आरक्षण आहे. त्यात निवडणूक होणार आहे. एकूण 12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समितीतींसाठी निवडणूक होणार आहे.