24 तास वीज पुरवठ्यासाठी सरकारचा नवा निर्णय, नियम तोडणाऱ्या कंपनीवर काय कारवाई?

| Updated on: Dec 21, 2020 | 11:53 PM

वीज कंपन्या ग्राहकांकडून बिल वसूली तकादा लावून करतात, मात्र जेव्हा वीज पुरवठा करण्याची वेळ येते तेव्हा मात्र ग्राहकांना अनेकदा वीज खंडीत झाल्याच्या तक्रारीला सामोरं जावं लागतं.

24 तास वीज पुरवठ्यासाठी सरकारचा नवा निर्णय, नियम तोडणाऱ्या कंपनीवर काय कारवाई?
electricity bill
Follow us on

नवी दिल्ली : सरकारने वीज ग्राहकांना सशक्त करण्यासाठी आज (21 डिसेंबर) मोठा निर्णय घेतला आहे. वीज कंपन्या ग्राहकांकडून बिल वसूली तकादा लावून करतात, मात्र जेव्हा वीज पुरवठा करण्याची वेळ येते तेव्हा मात्र ग्राहकांना अनेकदा वीज खंडीत झाल्याच्या तक्रारीला सामोरं जावं लागतं. आता मात्र असा मनमानी कारभार करणाऱ्या कंपन्यांवर जरब बसणार आहे. सरकारच्या नव्या नियमानुसार वीज ग्राहकांना 24 तास वीज पुरवठा करणे आणि वेळेवर सेवा देण्यासंबंधी नियमावली तयार केली आहे. या नियमांनुसार वीज वितरण कंपनीने ग्राहकांना नियमाप्रमाणे वीज पुरवठा न केल्यास त्यांना दंडाची शिक्षा होणार आहे (24 hours Electricity services on time to consumers government new norms).

वीज मंत्री आर. के. सिंह म्हणाले, “आता कोणताही वीज ग्राहक विना वीज राहणार नाही. वीज वितरण कंपन्यांना योग्य सेवा द्यावी लागेल आणि त्यांनी याचं पालन केलं नाही, तर त्यांना दंड भरावा लागेल.” वीज मंत्रालयाचे हे नियम वीज ग्राहकांचे अधिकार वाढवणारे आहेत. सिंह यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकार परिषद घेत या नव्या नियमांची माहिती दिली. तसेच हे नियम वीज ग्राहकांना ताकद देणारे असल्याचं म्हटलं.

आर. के. सिंह म्हणाले, “वीज व्यवस्था ही वीज ग्राहकांच्या सेवासाठी आहे या विश्वासावर हे नियम करण्यात आले आहेत. वीज ग्राहकांना चांगल्या सेवा देणे, विश्वासार्ह, गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा मिळवण्याचा अधिकार आहे. संपूर्ण देशात वीज वितरण कंपन्यांचीच एकाधिकारशाही आहे, मग त्या सरकारी असो की खासगी. दुसरीकडे वीज ग्राहकांकडे मात्र काहीही अधिकार नाहीत. त्यामुळेच वीज ग्राहकांच्या अधिकारांचे नियम तयार करणे आवश्यक आहे. जेणेकरुन याची प्रभावी अंमलबजावणी होईल.”

‘नियम तोडल्यास दंड भरावा लागणार’

वीज कंपन्यांनी वीज ग्राहकांना नियमित वीज पुरवठा न करत नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधित कंपनीला दंड होणार आहे. हा दंड वीज ग्राहकांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात येईल. वीज कंपन्यांच्या कामाचं मुल्यांकनही होणार आहे. यात वीज जोडणी देण्यासाठी लागणारा वेळ, वीज जाणे आणि येणे यासाठीचा वेळ, मीटर दुसरीकडे लावण्याचा वेळ, खराब मीटर दुरुस्त करणे, वेळेवर वीज बिल देणे, वीज बिलाविषयीच्या तक्रारींचं निवारण यासाठी लागणारा वेळ यांचा समावेश असेल. यानुसारच या कंपन्यांचं मुल्यांकन होईल. ही सर्व काम करण्यासाठी निश्चित वेळ ठरवून देण्यात येईल. या वेळेत ही कामं न झाल्यास कंपन्यांना ग्राहकांना भरपाई द्यावी लागेल.

24×7 टोल फ्री हेल्पलाइन कॉल सेंटर

वीज वितरण कंपन्यांना ग्राहकांसाठी 24×7 टोल फ्री हेल्पलाईन सेवा देखील सुरु करावी लागणार आहे. येथे ग्राहकांना आपल्या तक्रारी नोंदवता येणार आहेत. कोणतीही तक्रार वीज कंपन्यांना 45 दिवसांच्या आत सोडवावी लागणार आहे.

हेही वाचा :

“आली-आली-आली, गेली-गेली-गेली”, भाजप अध्यक्षांकडून प्रचारात बिहारमधील लहानपणीचा किस्सा

Mumbai Power Cut: तपास पथकाचा अहवाल आठवडाभरात येणार; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच- राऊत

चिपळूणमध्ये 22 लाखांची वीज चोरी, चोरांविरोधात कठोर कारवाई

24 hours Electricity services on time to consumers government new norms