पहाटेच 8 पाहुणे धडकणार, नामिबियाचे चित्ते, वाघाचं विमान, 11 तास प्रवास, वाचा 10 अपडेट्स

| Updated on: Sep 16, 2022 | 3:07 PM

नामिबियातून येणाऱ्या 8 चित्त्यांपैकी दोघे खूप छान मित्र आहेत, असं सांगितलं जातंय. या चित्त्यांसाठी नामिबियातील चित्ता कंझर्वेशन फाउंडेशनसोबत भारतानं 12 वर्षांचा करार केला आहे.

पहाटेच 8 पाहुणे धडकणार, नामिबियाचे चित्ते, वाघाचं विमान, 11 तास प्रवास, वाचा 10 अपडेट्स
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्लीः अनेक वर्षांपासून प्रतीक्षित पाहुणे उद्या अखेर भारतात येत आहेत. आफ्रिकी चित्त्यांचं भारतात आगमन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त (Narendra Modi Birth Day) उद्या पहाटेच नामिबिया (Namibia) येथून 8 चित्ते (Cheetah in India) भारतात येतील. समस्त प्राणी आणि निसर्गप्रेमींच्या नजरा या घटनेकडे लागल्या आहेत. भारत सरकारनेही वाघाच्या प्रतिमेनी सजवलेलं एक सुंदर विमान या पाहुण्यांना आणण्यासाठी तयार केलंय. काही वेळातच हे विमान भारतातून नामिबियाच्या दिशेने टेक ऑफ करेल. आज संध्याकाळनंतर ते नामिबियातील 8 चित्त्यांना घेऊन पुन्हा भारताच्या दिशेने परत येईल. 17 सप्टेंबर रोजी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये या चित्त्यांना सोडतील. 70 वर्षांनंतर भारतात चित्त्यांचं दर्शन होईल. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला या चित्त्यांबद्दल उत्सुकता लागली आहे. 1948 मध्ये एकदा भारतात चित्त्याचं दर्शन झालं होतं. तेसुद्धा शिकारीत मारले गेले. आता पुन्हा एकदा भारतात चित्ते आणले जात आहेत.

  1. नामिबियातून चित्त्यांना आणण्यासाठी खास तयारी झाली आहे. प्राण्यांना प्रवासात काही त्रास होऊ नये, यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे
  2.  चित्त्यांना आणण्यासाठी B747 Jumbo विमान तयार करण्यात आलंय. त्यावर वाघाचे पेंटिंग करण्यात आले आहे. लँड ऑफ टायगर असा संदेश त्यातून दिला जातोय. विमानात खास प्रकारचे पिंजरे तयार करण्यात आले आहेत.
  3.  भारतात आणण्यापूर्वी चित्त्यांचं आवश्यक लसीकरण पूर्ण झालंय. त्यांच्या मानेत सॅटेलाइट कॉलर लावलेले आहे. जेणेकरून त्यांच्या हालचालीवर नजर ठेवली जाईल.
  4. भारतात आणण्यापूर्वी त्यांना ओटिवारंगो येथील सीसीएफ सेंटरमध्ये क्वारंटाइन करण्यात आलंय.
  5. चित्त्यांचे आरोग्य आणि शिकारीची क्षमता या दोन निकषांनुसार निवड करण्यात आली आहे. त्यांची प्रजनन क्षमताही पुरेशी असल्याने यानंतर चित्त्यांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा आहे.
  6.  नामिबियाची राजधानी विंधोएक होसी कुटाको इंटरनॅशनल एअरपोर्टवरून आज रात्रीच हे विमान भारताच्या दिशेने निघेल. विमानाच्या केबिनमध्ये 8 पिंजरे तयार करण्यात आले आहेत.
  7.  प्रवासात चित्त्यांना अन्न दिले जाणार नाही. जेणेकरून 11 तासांचा प्रवास सुरळीत होईल. विमानाची प्रवास क्षमता १६ तासांची असून हवेतही त्यात इंधन भरले जाऊ शकते.
  8.  शनिवारी सकाळी ग्वाल्हेरमध्ये विमान उतरेल तेथून त्यांना मध्य प्रदेशातील कूनो नॅशनल पार्कमध्ये आणले जाईल.  सुरुवातीला काही दिवस क्वारंटाइन ठेवलं जाईल. त्यानंतर त्यंना मोठ्या पिंजऱ्यात आणि त्यानंतर मोकळ्या जंगलात सोडलं जाईल.
  9.  8 चित्त्यांपैकी दोघे खूप छान मित्र आहेत, असं सांगितलं जातंय. या चित्त्यांसाठी नामिबियातील चित्ता कंझर्वेशन फाउंडेशनसोबत भारतानं 12 वर्षांचा करार केला आहे.
  10.  भारतात आफ्रिकी चित्ते आणण्याच्या या प्रकल्पावर 2009 मध्ये काम सुरु झालं होतं. मात्र कोविड 19 मुळे प्रोजेक्ट लांबणीवर पडला होता.