बिहारमधील सत्ताबदलाचा एनडीएला मोठा फटका? आज निवडणूक झाली तर 286 जागा मिळणार- सर्व्हे

| Updated on: Aug 11, 2022 | 10:22 PM

बिहारमधील सत्तापालटानंतर देशात आज लोकसभा निवडणुका (Loksabha Election) झाल्या तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएला मोठा फटका बसू शकतो. आजतक आणि सी व्होटरने केलेल्या सर्व्हेनुसार एनडीएच्या 286 जागा निवडून येऊ शकतात!

बिहारमधील सत्ताबदलाचा एनडीएला मोठा फटका? आज निवडणूक झाली तर 286 जागा मिळणार- सर्व्हे
नरेंद्र मोदी, नितीश कुमार
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गटाच्या सहाय्यानं भाजप पुन्हा सत्तेत आली असली तरी बिहारमध्ये (Bihar) मात्र भाजप सत्तेच्या बाहेर फेकली गेलीय. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत भाजपसोबत काडीमोड घेतलाय. इतकंच नाही तर आपण NDA तूनही बाहेर पडल्याचं त्यांनी जाहीर केलं. राजीनामा दिल्यानंतर लगेच नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आरजेडीचे तेजस्वी यादव यांच्यासोबत घरोबा केला. बिहारमधील सत्तापालटानंतर देशात आज लोकसभा निवडणुका (Loksabha Election) झाल्या तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएला मोठा फटका बसू शकतो. आजतक आणि सी व्होटरने केलेल्या सर्व्हेनुसार एनडीएच्या 286 जागा निवडून येऊ शकतात!

आता निवडणुका झाल्या तर काय?

सर्व्हेनुसार जर 1 ऑगस्टपर्यंत लोकसभा निवडणूक झाली तर 543 जागांपैकी एनडीएला 307 जागा, यूपीएला 125 जागा तर अन्य पक्षांना 111 जागा मिळू शकतात. बिहारमधील सरकार बदलल्यानंतर आता निवडणुका झाल्या तर एनडीएला थेट 21 जागांचं नुकसान होऊ शकतं. एनडीएच्या जागा कमी होऊन 286 जागा निवडून येऊ शकतात. तर यूपीएला 146 आणि अन्य पक्षांना 111 जागा मिळण्याची शक्यता आहे.

आता निवडणूक झाल्या तर एनडीएला 41.4 टक्के मतं मिळतील. तर यूपीएला 28.1 टक्के आणि अन्य पक्षांना 30.6 टक्के मत मिळतील. म्हणजे यावेळी एनडीएला यूपीएपेक्षा 13.3 टक्के जास्त मतं मिळतील.

पंतप्रधान पदासाठी मोदींच्याच नावा पसंती

या सर्वेक्षणात लोकांना पुढचा पंतप्रधान कोण होईल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 53 टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती दिली. सर्वेक्षणात पंतप्रधान म्हणून दुसऱ्या स्थानावर राहुल गांधींचं नाव आहे. त्यांना 9 टक्के लोकांनी पसंती दिलीय. तर या सर्व्हेमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही मागे टाकलं आहे. केजरीवाल यांना 6 टक्के, योगी आदित्यनाथ यांना 5 टक्के तर शाह यांना 3 टक्के लोकांनी पसंती दिलीय.

28 टक्के लोक म्हणतात एनडीए सरकारचं काम चांगलं

सर्वेक्षणात एनडीए सरकारचं कामकाज खूप चांगलं असल्याचं मत 28.1 टक्के लोकांनी व्यक्त केलंय. तर 23.7 टक्के लोक एनडीए सरकारचं काम खूप वाईट असल्याचं म्हणत आहेत. त्याचवेळी 28 टक्के लोक एनडीए सरकारचं काम चांगलं, तर 8.5 टक्के लोक एनडीए सरकारचं कामकाज वाईट असल्याचं सांगतात.

42.8 टक्के लोकांची मोदींच्या कामाला पसंती

या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी यांच्या कामाबाबतही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी 42.8 टक्के लोक मानतात की पंतप्रधान मोदींनी चांगलं काम केलं. तर 22.7 टक्के लोक मोदींनी खूप चांगलं काम केल्याचं सांगतात. तर 13.2 टक्के लोक मोदींचं काम वाईट, तर 12.9 टक्के लोक मोदींचं काम खूप वाईट असल्याचं म्हणतात.

आजतक आणि सी व्होटरने फेब्रुवारी 2022 ते 9 ऑगस्ट 2022 दरम्यान हा सर्व्हे केला होता. या सर्वेक्षणात 1 लाख 22 हजार 16 लोकांचा सहभागी होता. 9 ऑगस्ट ही सर्वेक्षणाची तारीख निश्चित केली गेली कारण त्या दिवशी नितीश कुमार यांनी भाजपसोबत युती तोडण्याची घोषणा केली.