Pakistan Deploys Chinese Howitzer : पाकिस्तानने बॉर्डरवर 250 हॉवित्जर तोपा आणून ठेवल्यानंतर भारतही गप्प नाही बसणार, स्पष्ट शब्दात सांगितलं की..
Pakistan Deploys Chinese Howitzer : भारताला लागून असलेल्या सीमेवर पाकिस्तानने 50 किलोमीटरपेक्षा जास्त रेजं असलेल्या चिनी बनावटीच्या तोपा तैनात केल्या आहेत. पाकिस्तानच्या या आक्रमक कृतीनंतर भारतही गप्प बसणार नाहीय. भारताने सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

भारताला लागून असलेल्या सीमेवर पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात चिनी बनावटीच्या तोपा तैनात केल्या आहेत. या तोपांची रेंज 50 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. पाकिस्तानच्या या कृतीवर आता भारताने प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रीय हिताच्या सुरक्षेसाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व करु असं भारताने म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत भारताकडून यावर उत्तर देण्यात आलं. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादावर भारताची भूमिका बदलेली नाही. भारत आपल्या संरक्षणासाठी पूर्णपणे सज्ज आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले. “ऑपरेशन सिंदूरच्यावेळी आपण सर्वांनी पाहिलं असेल पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यात आलं. सीमेपलीकडून चालणारा दहशतवाद थांबला पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आपल्या राष्ट्रीय हितासाठी जे काही करणं गरजेचं आहे ते सर्व करु. त्यासाठी आम्ही नेहमीच सतर्क आणि तैनात आहोत” असं जैस्वाल बोलले.
पाकिस्तानने भारताला लागून असलेल्या पश्चिमी सीमेवर चिनी बनावटीच्या 250 हॉवित्जर तोपा तैनात केल्या आहेत. पाकिस्तानकडून त्यांच्या तोपखान्याच्या आधुनिकीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. पाकिस्तानने 2019 साली चीनच्या सरकारी कंपनीला 236 हॉवित्झर तोपांची ऑर्डर दिली होती. त्यांची डिलिवरी 2022 पासून सुरु झाली. पाकिस्तानने या तोपांच्या निर्मितीसाठी चीनसोबत ट्रान्सफर ऑफ टेक्नेलॉजीचा करार केला आहे. पाकिस्तानने गुजरनवाला, सियालकोट, जलालपूर या ठिकाणी भारताला लागून असलेल्या सीमांवर या तोपा तैनात केल्या आहेत. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरच्यावेळी सुद्धा या तोपा वापरल्या होत्या.
हे सत्य तुम्ही लपवू शकत नाही
नकुतीच पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये निवडणूक झाली. त्यावर सुद्धा रणधीर जैस्वाल यांनी टीका केली. POK मधील निवडणुका हा संपूर्णपणे हास्यास्पद प्रकार आहे. लोकांचा आवाज दाबण्यासाठी पाकिस्तानने बळाचा वापर केल्याचा आरोप भारताने केला. “ते जे काय म्हणतायत पीओकेमध्ये निवडणुका झाल्या, तो संपूर्णपणे हास्यास्पद प्रकार आहे. खरं हे आहे की आंदोलकांची हत्या करण्यात आली. हे सत्य तुम्ही लपवू शकत नाही” असं जैस्वाल म्हणाले.
पाकिस्तानला जबाबदार ठरवून त्यांच्याकडून उत्तर घ्या
पाकव्याप्त काश्मीरमध्ये जूनपासून जवळपास 90 नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी लोकांच्या असंतोषाला बंदुकीच्या गोळ्या, धमकावणं, आवाज दडपणं या मार्गाने उत्तर दिलं. आंतरराष्ट्रीय समुदायाने यासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवून त्यांच्याकडे उत्तर मागितलं पाहिजे अशी भारताची भूमिका आहे.