3 राज्यातील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षांनी दिल्लीत बोलवली INDIA आघाडीची बैठक

Assembly election 2023 : चार पैकी तीन राज्यांमध्ये भाजपने विजय मिळवत काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. काँग्रेसने आजच्या निकालानंतर इंडिया अलायन्सची बैठक बोलवली आहे. इंडिया अलायन्समधील पक्षांना सोबत न घेता काँग्रेसने निवडणूक लढवली होती.

3 राज्यातील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षांनी दिल्लीत बोलवली INDIA आघाडीची बैठक
India Alliance
| Updated on: Dec 03, 2023 | 7:24 PM

नवी दिल्ली : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आज मतमोजणी होत आहे. काँग्रेसचा तीन राज्यात पराभव झाला असून एका राज्यात विजय मिळवला आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. तीन राज्यातील पराभवानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 6 डिसेंबर रोजी दिल्लीत विरोधी इंडिया आघाडी बैठक बोलावली आहे.

दिल्लीत बैठकीचं आयोजन

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षांची इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक बोलवली आहे. 6 डिसेंबरला दिल्लीत विरोधी पक्षांचे नेते एकत्र येणार आहेत. पाच राज्यांचे निकाल लागल्यानंतर विरोधी आघाडीची बैठक बोलावण्यात येईल, असेही खरगे यांनी यापूर्वी सांगितले होते.

जागावाटपाबाबत चर्चा

इंडिया आघाडीच्या बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी आघाडीची रणनीती आणि जागावाटप निश्चित करण्यापूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा येथे काँग्रेसची बैठक होणार आहे.

काँग्रेसला इतर विरोधी पक्षाला सोबत न घेता एकटीच लढल्याने अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आता काँग्रेस इंडिया आघाडीतील इतर पक्षांना सोबत घेऊनच निवडणुका लढवेल अशी शक्यता आहे. तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि समाजवादी पार्टी या पक्षांना जागावाटप लवकरात लवकर निश्चित व्हावे अशी इच्छा होती, परंतु विधानसभा निवडणुकीमुळे या संदर्भातील चर्चा पुढे ढकलण्यात आली.

एकत्र रॅली काढणार

मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी 26 पक्षांनी I.N.D.I.A. या नावाने युती केली आहे. इंडिया आघाडीची संयुक्त रॅली काढण्यात येणार आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. पण आता या रॅलीच्या माध्यमातून विरोधीपक्ष शक्तीप्रदर्शन करणार आहे.