इयत्ता तिसरीपासून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात एआयचा अंतर्भाव,केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा

भारत बोधन एआय कॉनक्लेव्ह २०२६ चे उद्घाटन दिल्लीत झाले आहे. या दोन दिवसांच्या चर्चासत्रात एआय संदर्भातील सामूहिक चिंतन भारताचे एआय क्षेत्रातील नेतृत्व विकसित करण्यास मदत करणार असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उद्घाटन सत्रात सांगितले.

इयत्ता तिसरीपासून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात एआयचा अंतर्भाव,केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
भारत बोधन एआय कॉनक्लेव्ह २०२६'
| Updated on: Feb 12, 2026 | 6:50 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला एआय तंत्रज्ञानाने परिपूर्ण करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने येत्या काही काळात विद्यार्थ्यांच्या इयत्ता तिसरीपासून अभ्यासक्रमात एआयचा अंतर्भाव होणार असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. एआय इम्पॅक्ट समीटच्या आधी  ‘भारत बोधन एआय कॉनक्लेव्ह २०२६’ हे पाऊल असल्याचे या परिषदेच्या उद्घाटन सत्रानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले.

भारत बोधन एआय कॉनक्लेव्ह २०२६’ चे उद्घाटन आज झाले. या दोन दिवसांच्या परिषदेत शिक्षण क्षेत्र, उद्योग, धोरणकर्ते, स्टार्ट-अप्स, इनोव्हेशन, वैज्ञानिक लीडरशिप आणि कौशल्य विकास क्षेत्रातील प्रतिनिधींनी एकत्र येऊन शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर एआयचा वापर कसा करावा आणि #AIInEducation चे एकत्रीकरण आणि ‘भारत EduAI स्टॅक’ विकसित करण्यासाठी चर्चा होणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यावेळी म्हणाले की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला एआय-सज्ज बनवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी नैतिक, जबाबदार आणि सर्वसमावेशक एआयच्या विकास आणि वापरावरही भर दिला आहे. भारताचे एआय रचनात्मकदृष्ट्या सर्वसमावेशक, आर्किटेक्चरच्या दृष्टीने परस्पर-सुसंगत आणि क्षमतेच्या दृष्टीने स्वायत्त असेल असेही ते यावेळी म्हणाले.

येथे पोस्ट पाहा –

आपल्याला विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी आणि शिक्षकांना बळकटी देण्यासाठी शिक्षणात एआय समाविष्ट करावे लागणार आहे. शिक्षण व्यवस्थेचे परिवर्तन आणि विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्र येऊन विस्तारक्षम, जबाबदार, नैतिक, सर्वसमावेशक आणि भारतकेंद्री स्वायत्त एआय मॉडेल्स उभारावीत, असे मी आवाहन करतो असेही धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.

भारताची एआय क्षमता वाढविण्यास मदत

या दोन दिवसीय परिषदेतून मिळणारे सामूहिक चिंतन भारताची एआय क्षमता वाढविण्यास, एआय क्षेत्रात भारताचे नेतृत्व प्रस्थापित करण्यास, शिक्षणात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारण्यास आणि सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मार्गदर्शक ठरेल, असाही मला विश्वास असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले.