BREAKING | सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी आजची विरोधी पक्षांची बैठक आटोपून बंगळुरु येथून दिल्लीच्या दिशेला रवाना झाले होते. या दरम्यान भोपाळ येथे त्यांच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे.

BREAKING | सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग
Reporter Sandeep Rajgolkar | Edited By: Chetan Patil | Updated on: Jul 18, 2023 | 9:58 PM

भोपाळ :  काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे कालपासून कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुत होते. विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी ते बंगळुरुला गेले होते. विरोधी पक्षांची बैठक आटोपून ते परत दिल्लीला निघाले होते. या दरम्यान भोपाळच्या राजा भोज विमानतळावर त्यांच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे.  विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. पण एएनआय वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने खराब हवामानामुळे सोनिया गांधी यांच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचं वृत्त दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमध्ये सध्या वातवरण खराब असल्याने राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे वातावरण पूर्ववत होण्याची वाट पाहत आहेत. भोपाळ विमानतळाच्या व्हीआयपी लाऊंजमध्ये ते थांबले आहेत. ते आता इंडिगोच्या फ्लाईटने रात्री साडेनऊ वाजता दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे.

विरोधी पक्षांच्या बैठकील 26 पक्षांचा सहभाग

विरोधी पक्षांच्या आजच्या बैठकीला देशभरातील 26 पक्ष सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे या बैठकीला गेले होते. उद्धव ठाकरे कालच बैठकीला बंगळुरुला गेले होते. त्यांचं बंगळुरु विमानतळावर स्वागत करण्यात आलं होतं. तसेच उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात 20 मिनिटे चर्चा झाल्याची देखील माहिती समोर आली होती. तसेच विरोधी पक्षांची कालदेखील महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसकडून सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

विरोधी पक्षांची आजदेखील महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. विरोधी पक्षांची आजची बैठक जास्त महत्त्वाची होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या बैठकीसाठी हजर होते. या बैठकीनंतर विरोधी पक्षांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुढची बैठक मुंबईत आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच विरोधकांच्या आघाडीचं इंडिया असं नाव ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

विरोधी पक्षांसोबत समन्वय साधण्यासाठी एक समन्वय समिती नेमली जाणार आहे. यासाठी 10 जणांची निवड पुढच्या मुंबईतील बैठकीत केली जाईल, अशी माहिती मल्लिकार्जुन खर्गे यांनी या बैठकीत दिली. त्यामुळे विरोधी पक्षांची पुढची बैठक महत्त्वाची आहे.

Follow Us