Arvind Kejriwal : ‘महाराष्ट्राचे पाटील गुजरात भाजपचे अध्यक्ष, भाजपला एकही गुजराती मिळाला नाही?’, गुजरात दिनीच केजरीवालांचा सवाल

| Updated on: Aug 10, 2022 | 3:44 PM

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने बाजी मारल्यानंतर आता केजरीवाल यांनी आपला मोर्चा गुजरातकडे वळवला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपने जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून केजरीवाल यांच्या उपस्थितीत आज गुजराच्या भरुच जिल्ह्यात आपचा आदिवासी संकल्प महामेळावा पार पडला.

Arvind Kejriwal : महाराष्ट्राचे पाटील गुजरात भाजपचे अध्यक्ष, भाजपला एकही गुजराती मिळाला नाही?, गुजरात दिनीच केजरीवालांचा सवाल
अरविंद केजरीवाल, सी. आर. पाटील
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : आज 1 मे अर्थात महाराष्ट्र दिन. एकीकडे महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्र दिन साजरा करतेय. तर दुसरीकडे गुजरातमध्येही गुजरात दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अशावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील (C.R. Patil) यांच्यावरुन केजरीवालांनी भाजपला खोचक सवाल केलाय. सी. आर. पाटील हे मुळचे महाराष्ट्रातील आहेत. तोच धागा पकडत केजरीवाल यांनी भाजपला डिवचलं आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी भाजपला एखादा गुजराती मिळाला नाही का? असा सवाल केजरीवाल यांनी गुजरात दिनाचं (Gujrat Day) औचित्य साधत विचारला आहे? पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने बाजी मारल्यानंतर आता केजरीवाल यांनी आपला मोर्चा गुजरातकडे वळवला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपने जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून केजरीवाल यांच्या उपस्थितीत आज गुजराच्या भरुच जिल्ह्यात आपचा आदिवासी संकल्प महामेळावा पार पडला.

‘भाजपवाल्यांनो, गुजरातला गुजराती अध्यक्ष द्या’

‘महाराष्ट्राचे सी. आर. पाटील गुजरात भाजपचे अध्यक्ष आहेत. भाजपला आपला अध्यक्ष निवडण्यासाठी एकही गुजराती मिळाला नाही? लोक सांगतात की ते फक्त अध्यक्ष नाहीत, तर गुजरात सरकार तेच चालवतात. खरे मुख्यमंत्री तेच आहेत! हा तर गुजरातच्या जनतेचा घोर अपमान आहे. भाजपवाल्यांनो, गुजरातला गुजराती अध्यक्ष द्या’, असं ट्वीट करत केजरावाल यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. महत्वाची बाब म्हणजे केजरीवालांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपावरुन गुजरात दिनीच ट्वीट केल्यानं त्यांनी गुजराती समाजाच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

आपचा आदिवासी संकल्प मेळावा

आदिवासी संकल्प महामेळाव्यात बोलताना केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. देशातील 2 सर्वात श्रीमंत व्यक्ती गुजरातमधून येतात. तर देशातील सर्वात गरीब आदिवासीही गुजरातमधूनच आहेत. काँग्रेस आणि भाजप श्रीमंतांसोबत आहे. ते श्रीमंतांना अधिक श्रीमंत बनवत आहेत. तर आम आदमी पार्टी गरिबांसोबत उभी आहे. गुजरातमध्ये आमची पहिली रॅली आदिवासी भागात करत आहोत. आधी इंग्रजांनी आदिवासींवर अन्याय केला. पुढे आमच्याच लोकांनी आदिवासींचं शोषण केलं. मोठ्या प्रकल्पांच्या नावानं त्यांना विस्थापित केलं गेलं. दिल्लीतील लोक माझ्यावर खूप प्रेम करतात. आज मी गुजरातच्या नागरिकांकडून प्रेम मागण्यासाठी आलोय. मी गुजरातमधील 6 कोटी लोकांशी नातं जोडण्यासाठी आलो आहे, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

महाराष्ट्र दिनानिमित्त केजरीवालांच्या शुभेच्छा

दुसरीकडे केजरावील यांनी आज महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेलाही शुभेच्छा दिल्या आहे. ‘महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनी सर्व प्रदेशवासियांना खुप-खुप शुभेच्छा आणि शुभकामना’, असं ट्वीट करत केजरीवाल यांनी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.