Bageshwar Baba : बागेश्वर बाबा यांनी अंनिसचं 30 लाखांचं ‘ते’ आव्हान स्वीकारलं; म्हणाले, नागपूर नको, ‘या’ ठिकाणी या, तिकीटही देऊ

| Updated on: Jan 20, 2023 | 1:00 PM

नागपूरमध्ये पत्रकार भवनात त्यांनी चमत्कार सिद्ध करावा. ऐनवेळी आम्ही त्यांच्यासमोर दहा लोकं ठेवू. या दहा लोकांचं नाव, वय, फोननंबर आणि आईवडिलांची नावे त्यांनी सांगावीत.

Bageshwar Baba : बागेश्वर बाबा यांनी अंनिसचं 30 लाखांचं ते आव्हान स्वीकारलं; म्हणाले, नागपूर नको, या ठिकाणी या, तिकीटही देऊ
shyam manav
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जयपूर: आपल्या दिव्यशक्तीने चमत्कार घडवून आणण्याचा दावा बागेश्वर बाबांनी केला आहे. बागेश्वर बाबांच्या या आव्हानाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी आव्हान दिलं आहे. बागेश्वर बाबांनी आपल्या दिव्यदृष्टीचा चमत्कार सिद्ध करून दाखवावा आणि 30 लाख रुपये घेऊन जावे, असं आव्हानच श्याम मानव यांनी बागेश्वर बाबांना दिलं आहे. हे आव्हान दिल्यानंतर बागेश्वर बाबाही इरेला पेटले आहेत. त्यांनीही श्याम मानव यांचं आव्हान स्वीकारलं आहे. मी चमत्कार सिद्ध करण्यास तयार आहे. पण मी नागपूरला येणार नाही. तुम्हीच रायपूरला या, असं आव्हानच बागेश्वर बाबांनी दिलं आहे.

बागेश्वर बाबांनी श्याम मानव यांचं आव्हान स्वीकारलं आहे. श्याम मानव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रायपूरला यावं. आम्ही त्यांना येण्याजाण्याचं तिकीटही देऊ. आम्ही तुमचं आव्हान स्वीकारतो. मी मात्र नागपूरला येणार नाही, असं बागेश्वर बाबांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

आम्ही आव्हान स्वीकारतो

छत्तीसगडी लोक अद्भूत आहेत. सनातन धर्माची ताकद कुणालाही समजणार नाही. सनातन धर्माची ताकद खूप मोठी आहे. चमत्कार पाहायचा असेल तर त्यांनी रायपूरला यावं. एक नाही हजारो लोक येतील. आम्ही सर्व काही उघड करू. बंद दरवाजाआड काही करणार नाही. आमच्यासमोर लाखो लोक येतील. त्यांनीही यावं. आम्ही त्यांचं आव्हान स्वीकरतो, असं बागेश्वर बाबा म्हणाले.

आम्ही घरवापसी करणारच

मी इतरांच्या मनातील ओळखतो ही माझ्या गुरुची कृपा आहे. सनातनच्या मंत्राची ताकद आहे, असा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी धर्मांतरावरही भाष्य केलं. आम्ही लोकांचं धर्मांतर करत नाही. तर त्यांची घरवापसी करत आहोत. धर्मांतर रोखत आहोत. फक्त काही लोक या कामाच्या आड येत आहेत. त्यांना आम्ही धडा शिकवणार आहोत. कोणी कितीही आमच्या मार्गात अडथळा आणला तरी आम्ही घरवापसी करणारच. आम्ही शेर आहोत, असं ते म्हणाले.

हिंदूंनाच का टार्गेट केलं जातं?

डाव्या विचाराचे लोक आमच्याविरोधात आहेत. सनातनी विचाराचे लोक आमच्यासोबत आहेत. केवळ हिंदूंनाच टार्गेट का केलं जातं. पाद्री आणि मौलवींना का आव्हान दिलं जात नाही? त्यांना टार्गेट का केलं जात नाही. त्यामुळेच आम्ही हिंदूंना जागे होण्याचं आवाहन करत आहोत, असंही ते म्हणाले.

जे काही होईल ते नागपुरातच

श्याम मानव यांनी मात्र बागेश्वर बाबांचं हे आव्हान नाकारलं आहे. रायपूरला तुमची माणसं असतील. तुमचा मंच असेल. सर्व काही तुमच्या म्हणण्यानुसार होईल. असं आव्हान पूर्ण होणार नाही. आव्हान फक्त महाराष्ट्रातील नागपुरात पूर्ण होईल. दहा लोकांच्या उपस्थितीत होईल. त्यांच्यासमोरच हा निर्णय होईल, असं श्याम मानव यांनी म्हटलं आहे.

अनेक बाबांना एक्सपोज केलं

चमत्कारीक शक्ती नसते हे सिद्ध होण्यासाठी आम्ही बागेश्वर बाबांना आव्हान दिलं आहे. कोणतीही बदमाशी करण्यासाठी संधी मिळू नये म्हणून आम्ही आव्हान देताना खबरदारी घेत असतो. कारण आम्ही अनेक बाबा एक्सपोज केले आहे. त्यामुळे ते काय करतात हे मला चांगलं माहीत आहे. काल दोन तासाचं पोलखोल व्याख्यान झालं. त्यावेळी मी काही बाबांची माहिती दिली, असं मानव म्हणाले.

नागपूरमध्ये पत्रकार भवनात त्यांनी चमत्कार सिद्ध करावा. ऐनवेळी आम्ही त्यांच्यासमोर दहा लोकं ठेवू. या दहा लोकांचं नाव, वय, फोननंबर आणि आईवडिलांची नावे त्यांनी सांगावीत. दिव्यदृष्टी असल्याचा त्यांनीच हा दावा केलेला आहे. त्यामुळे बाजूच्या रुममध्ये आम्ही दहा गोष्टी ठेवू. त्यांनी त्यांच्या दिव्यदृष्टीने या दहा गोष्टी ओळखाव्यात, असं त्यांनी सांगितलं.

अन्यथा तीन लाख रुपये जप्त होतील

या दहा गोष्टींची माहिती त्यांनी दोनदा 99 टक्के तंतोतंत सांगितल्या तर त्यांना 30 लाखांचे बक्षीस देऊ. त्यासाठी त्यांना 3 लाखांचं डिपॉझिट ठेवावं लागेल. पण या वस्तु ओळखण्यात ते दोनदा 99 टक्के अपयशी ठरले तर त्यांचे तीन लाख रुपये जप्त होतील, असंही त्यांनी सांगितलं.

तर संघटना बंद करेल

महाराज पैशासाठी आव्हान नाही स्वीकारणार नाहीत. तर ते दिव्यशक्ती सिद्ध करण्यासाठी समोर येतील. ते स्वत:ला वाघ समजतात तर त्यांनी समोर येऊन दिव्यदृष्टी असल्याचं सिद्ध करावं. त्यांनी दोनदा या गोष्टी सिद्ध केल्या तर मी त्यांच्या चरणी माथा टेकवील.

त्यांचं वय 26 वर्ष आहे. मी 71 वर्षाचा आहे. तरीही मी त्यांच्या चरणावर माथा टेकवून त्यांची माफी मागेल. आम्ही गेल्या 40 वर्षात अनेक अनेक बाबांचं ढोंग उघडं पाडलं आहे. पण बागेश्वरबाबांनी चमत्कार सिद्ध केल्यास मी माझी संघटना बंद करेल, असं आव्हानच त्यांनी दिलं.