कोवॅक्सिनच्या पहिल्या डोसनंतर 28 दिवस काहीच लक्षणं नाहीत, पश्चिम बंगालच्या नगरविकास मंत्र्यांना पुन्हा लस टोचली

| Updated on: Dec 30, 2020 | 6:49 PM

पश्चिम बंगालचे नगरविकास मंत्री फिरहाद हकीम यांनी या लसीकरणात सहभाग घेतला आहे (Bengal Minister took second time Covaxine trial).

कोवॅक्सिनच्या पहिल्या डोसनंतर 28 दिवस काहीच लक्षणं नाहीत, पश्चिम बंगालच्या नगरविकास मंत्र्यांना पुन्हा लस टोचली
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये कोवॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा पार पडत आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालचे नगरविकास मंत्री फिरहाद हकीम यांनी या लसीकरणात सहभाग घेतला आहे. हकीम यांना आज दुसऱ्या कोवॅक्सिन लस टोचण्यात आली. यापूर्वी 28 दिवसांआधी म्हणजे 2 डिसेंबरला त्यांना पहिल्यांदा लस टोचण्यात आली होती. त्यानंतर आता दुसऱ्यांदा त्यांना लस टोचण्यात आली (Bengal Minister took second time Covaxine trial).

“पहिल्या चाचणीनंतर गेल्या 28 दिवसांमध्ये मला कोणताच त्रास झाला नाही. डॉक्टर वारंवार फोन करुन माझ्या तब्येतीची विचारपूस करायचे. या लसीमुळे नक्कीच फायदा होईल”, अशी प्रतिक्रिया हकीम यांनी दिली (Bengal Minister took second time Covaxine trial).

“लसीने फायदाच होईल. जर नुकसान होणार असेल तर फारफार तर काय होईल? कदाचित माझा मृत्यू होईल. पण माझ्या मृत्यूने लोकांचा फायदा होणार असेल तर मी यासाठी तयार आहे. भारतात तयार झालेल्या या लसीचं यश जर माझ्यावर केलेल्या प्रयोगाने सिद्ध झालं तर याचा मला आनंद होईल”, असंदेखील हकीम म्हणाले.

देशभरात 28 सेंटरमध्ये 28 हजार 500 नागरिकांवर कोवॅक्सिनची चाचणी सुरु आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधील एक हजार नागरिकांचा समावेश आहे. या लसीचे कोणतेही साईडइफेक्ट निदर्शनास आले नाहीत तर ही लस लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

कोवॅक्सिनचे नो साईड इफेक्ट

भारताची स्वदेशी कोरोना लस (Corona Vaccine) कोवॅक्सिन चाचणीच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये प्रभावी असल्याची माहिती गेल्या आठवड्यात समोर आली होती. विशेष म्हणजे ही लस ज्या स्वयंसेवकांना टोचण्यात आली त्यांच्यावर कोणताही साईड इफेक्ट दिसला नव्हता. याउलट लस टोचल्यानंतर स्वयंसेवकांच्या शरीरात रोगप्रतिकार क्षमतेत चांगली वाढ झाली. भारत बायोटिक कंपनीच्या या लसीचं पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सप्टेंबर महिन्यातच संपन्न झालं होतं. या चाचणीचे परिणाम लगेच सार्वजनिक करण्यात आले होते. या स्वदेशी लसीकडून भारताला प्रचंड अपेक्षा आहेत.

लस कसं काम करते?

देशात ज्या लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे त्या प्रत्येक लसींचं वेगळं वैशिष्ट्य आहे. कोवॅक्सिन इतर कंपन्यांच्या लसींपेक्षा वेगळी आहे. कारण या लसीच्या निर्मितीसाठी आयसीएमआरनेदेखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. शरीरातील रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी या लसीचा चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे ही लस टोचल्यानंतर बराच वेळ व्यक्ती कोरोनापासून सुरक्षित राहू शकणार आहे.

कोवॅक्सिन विकसित करताना त्यामध्ये Alhydroxiquim-II हे घटकदेखील टाकण्यात आलं आहे. या घटकमुळे लसीची क्षमता वाढते. लस टोचल्यानंतर शरीरात अँटीबॉडीची क्षमता वाढते. या अँटीबॉडी शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवतील.

आपात्कालीन वापरासाठी लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता

भारत बायोटेक कंपनीने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे लसीच्या आपात्कालीन वापरासाठी अर्ज केला आहे. तज्ज्ञांच्या मते, फेब्रुवारी 2021 पर्यंत कोवॅक्सिन सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध होऊ शकते. एम्स रुग्णालयाच्या क्लिनिकल ट्रायलचे प्रमुख संशोधक डॉं संजय रॉय यांनी फेब्रुवारी 2020 पर्यंत लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल, अशी आशा आहे, असं मत मांडलं आहे.

संबंधित बातम्या :

Covishield vaccine A to Z | कोव्हिशिल्ड लसीचे किती डोस तयार, तुम्हाला कशी आणि किती रुपयात मिळणार?

भारताच्या चार राज्यात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’, जाणून घ्या नेमकं काय होणार…