केंद्रात आणि राज्यात मोठ्या उलथापालथी होणार, तारीख सांगत संजय राऊत यांचा मोठा दावा

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर देशात आणि राज्यात फार मोठ्या घडामोडी घडणार असल्यचा दावा केला आहे. या घडामोडी कधी घडतील त्याची तारीखही त्यांनी सांगितली आहे.

केंद्रात आणि राज्यात मोठ्या उलथापालथी होणार, तारीख सांगत संजय राऊत यांचा मोठा दावा
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 27, 2023 | 10:29 AM

नवी दिल्ली : सध्या सर्वच राजकीय पक्ष कर्नाटकातील निवडणूक प्रचारात व्यस्त आहे. कर्नाटकात भाजपची सत्ता जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपनेही सत्ता राखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसनेही कर्नाटकात जोर लावला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. कर्नाटकाच्या निवडणुकीनंतर म्हणजे 13 मे नंतर देशात आणि राज्यात मोठ्या घडामोडी घडणार आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

कर्नाटकाच्या निवडणुका होऊन जाऊ द्या. सर्वच राजकीय पक्ष हे कर्नाटकात आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधीही कर्नाटकाच्या निवडणुकीत व्यस्त आहेत. मीही 3 मे पासून सीमाभागात आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर देश आणि राज्यात मोठ्या घडामोडी होणार आहेत. 13 मे नंतर या घडामोडी घडणार आहेत, असा दावा करत संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली आहे. 13 मे नंतर नेमक्या काय घटना घडणार आहेत हे मात्र राऊत यांनी सांगितलं नाही. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

गृहमंत्र्यांना शोभत नाही

कर्नाटकात भाजपचा दारूण पराभव होताना दिसत आहे. मोदी कानडी वेशभूषा करून प्रचाराला जात आहेत. त्याचा फायदा होणार नाही. कर्नाटकात भाजप जिंकली तर दंगली होतील असं केंद्रीय गृहमंत्री म्हणत आहेत. दंगली होतील ही धमकी आहे. तुम्ही कायदा सुव्यवस्थेवर बोलायला हवं. भाजप शासित राज्यात ज्या दंगली आहेत. त्यावर का बोलत नाही? कर्नाटक हरलो तर दंगली होतील अशा धमक्या देणं हे गृहमंत्र्यांना शोभत नाही. चांगल्या गृहमंत्र्याचं लक्षण नाही. हे स्पष्ट सांगतो. हे दुर्देवी विधान आहे. तुम्ही काय करत आहात? पुलवामा झालं तेव्हा शांत होता. आताही शांत आहात. तुम्हाला लोकसभेचं राजकारण करायचं आहे. तुमचं राजकारण दंगली आणि हत्यांचं आहे. हे स्पष्ट होत आहे, असंही ते म्हणाले.

देशात आणि राज्यात भाकरी फिरवण्याची वेळ

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पक्षात भाकरी फिरवण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तो राष्ट्रवादीचा अंतर्गत निर्णयाचा भाग आहे. भाकरी फिरवण्याची वेळ देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात आली आहे, असं राऊत म्हणाले.

Follow Us