ऐन लोकसभा निवडणुकीत भाजप खासदाराचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन

| Updated on: Apr 24, 2024 | 9:04 PM

भाजपला एक धक्का देणारी वाईट बातमी समोर आली आहे. भाजपचे उत्तर प्रदेशच्या हाथरस लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार राजवीर सिंह दिलेर यांचं हृदय विकाराच्या झक्याने निधन झालं आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीत भाजप खासदाराचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन
भाजप खासदार राजवीर सिंह दिलेर यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे
Follow us on

हाथरस लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजवीर सिंह दिलेर यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. राजवीर दिलेर यांच्यावर अलीगडच्या वरुण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. या दरम्यान त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. या झटक्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. राजवीर दिलेर यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर हाथरसमध्ये शोककळा पसरली आहे. राजवीर दिलेर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. पण त्यांना आज अचानक हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि यामुळे त्यांचा मृत्यू झाला. राजवीर हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडणूक जिंकले होते. त्यांच्या निधनाची घटना ही दुखद असून या घटनेमुळे भाजपची वैयक्तिक मोठी हानी झाली आहे.

राजवीर सिंह दिलेर यांचे पिता किशन लाल दिलेर हे हाथरस लोकसभा मतदारसंघातून चार वेळा खासदार म्हणून निवडून गेले आहेत. ते 1996, 1998, 1999 आणि 2004 च्या लोकसभा निवडणुकीत हाथरसच्या जागेवर विजयी झाले आहेत. दोन्ही दिलेर पिता-पुत्रांचं हाथरस लोकसभा मतदारसंघाशी एक वेगळं भावनिक नातं आहे. दोघांनी हाथरस मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल नागरिकांमध्ये देखील आदराची भावना आहे.

पक्षाने यावर्षी लोकसभेचं तिकीट कापलं

राजवीर दिलेर यांना यावर्षी भाजपकडून लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं नव्हतं. त्यांच्या जागेवर हाथरस लोकसभा मतदारसंघातून अनूप वाल्मिकी यांना भाजपने लोकसभेचं तिकीट दिलं आहे. हाथरस लोकसभेचे प्रबळ दावेदार असतानाही त्यांना तिकीट न मिळाल्याने राजवीर चिंतेत होते. विशेष म्हणजे खासदार होण्यापूर्वी राजवीर अलीगडच्या इगलास विधानसभा मतदारसंघाचे 2017 मध्ये आमदार देखील झाले होते. आमदार असताना त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना यश आलं होतं.

राजवीर दिलेर हे मनमिळावू स्वभावाचे होते. पक्षाने तिकीट कापल्यानंतरही ते पक्षाचं काम करत होते. ते दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीगड येथे पार पडलेल्या सभेत सहभागी झाले होते. तसेच पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय असायचे. या मतदारसंघासाठी येत्या 7 मे ला मतदान होणार आहे. पण त्याआधीच राजवीर दिलेर यांच्या निधनामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजवीर सिंह दिलेर यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. राजवीर यांच्या कुटुंबियांप्रती आपल्या संवेदना आहेत. राजवीर यांचं निधन हे आपलं वैयक्तिक मोठं नुकसान आहे, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.