
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत बोलताना मोठी घोषणा केली आहे. त्यांनी दावा केला आहे की, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ३७० जागा तर एनडीए आघाडीला ४०० हून अधिक जागा मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा सरकार स्थापन होईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे. अमित शाह यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीवर कोणताही सस्पेंस नाहीये. काँग्रेस आणि इतर विरोधकांना देखील माहित आहे की, त्यांना पुन्हा विरोधात बसायचे आहे.
अमित शाह यांनी सांगितले की, आम्ही अनुच्छेद ३७० बरखास्त केला. त्यामुळे देश आम्हाला ३७० जागा देतील. तर एनडीएला ४०० जागा मिळणार आहेत. अमित शाह यांनी म्हटले की, 2019 मध्ये कायदा आला होता. या संदर्भात नियम निश्चित केल्यानंतर लोकसभा निवडणुकीआधी तो लागू केला जाईल. सीएए देशाचा कायदा आहे. लोकसभा निवडणुकीआधीच समान नागरिक कायदा आणायचे आहे यात कोणतीही शंका नाही.
गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, सीएए विरोधात मुस्लीम बांधवाना भडकवले जात आहे. सीएए फक्त पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमझ्ये छळ सहन करणाऱ्या लोकांसाठी भारताचे नागरिकत्व मिळावे म्हणून आहे. यातून कोणत्याही भारतीय नागरिकांचे नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाहीये.
समान नागरी संहिता (यूसीसी) बाबत बोलताना शाह म्हणाले की, उत्तराखंडमध्ये यूसीसीची अंमलबजावणी हा एक सामाजिक बदल आहे. धर्मनिरपेक्ष देशात धर्मावर आधारित नागरी कायदा नाही.”
लोकसभा निवडणूक ही फक्त एनडीए विरुद्ध विरोधी आघाडी अशी नाहीये, ही निवडणूक विकास विरुद्ध फक्त घोषणा अशी आहे. २०१४ मध्ये देशाची अर्थव्यवस्था खूप वाईट होती. यूपीए सरकारमध्ये मोठे घोटाळे झाले होते. परदेशातून गुंतवणूक येत नव्हती. त्यामुळे देशाला या गोष्टी माहित हवेती म्हणून आम्ही श्वेतपत्रिता काढून देशाला याची माहिती दिली. आमच्या १० वर्षाच्या काळात आम्ही कशा प्रकारे अर्थव्यवस्था सांभाळली. कशा प्रकारे परकीय गुंतवणूक आणली याबाबत माहिती देण्यासाठी ही योग्य वेळ होती.
अयोध्येतील राम मंदिरावर गृहमंत्री म्हणाले की, प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म ज्या ठिकाणी झाला, तिथेच मंदिर व्हावे अशी भारतातील जनतेची इच्छा होती.