Congress Chintan Shivir : ‘सत्ता आली तर EVM निवडणुकीतून हद्दपार करणार’, काँग्रेसच्या चिंतन शिबिरात पृथ्वीराज चव्हाणांचा प्रस्ताव

बैठकीवेळी अनेक नेत्यांनी EVM ला जोरदार विरोध केला. अनेक राजकीय पक्षांनी पराभवाचं कारण EVM असल्याचं म्हटलंय. त्यानंतर आपलं सरकार आलं तर निवडणुकीतून EVM दूर करु असं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

Congress Chintan Shivir : सत्ता आली तर EVM निवडणुकीतून हद्दपार करणार, काँग्रेसच्या चिंतन शिबिरात पृथ्वीराज चव्हाणांचा प्रस्ताव
| Updated on: May 15, 2022 | 5:28 PM

नवी दिल्ली : उदयपूरमध्ये काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिरात (Congress Chintan Shibir) निवडणूक आणि EVM बाबत मोठा प्रस्ताव ठेवण्यात आला. चिंतन शिबिराच्या शेवटच्या दिवशी EVM चा मुद्दा समोर आला. चिंतन शिबिरात पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर (Ballot Paper) निवडणुका घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, हा प्रस्ताव उपसमुहाकडून फेटाळण्यात आला. हा मुद्दा सर्व राजकीय पक्षांसाठी चिंतेचा आहे. त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीतच (All Party Meet) त्याबाबत निर्णय घेतला जाईल. बैठकीवेळी अनेक नेत्यांनी EVM ला जोरदार विरोध केला. अनेक राजकीय पक्षांनी पराभवाचं कारण EVM असल्याचं म्हटलंय. त्यानंतर आपलं सरकार आलं तर निवडणुकीतून EVM दूर करु असं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी चिंतन शिबिरात हा मुद्दा उपस्थित केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याचा उल्लेख करावा आणि हा मुद्दा जनतेमध्ये जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. हा आपला खासगी आणि वैयक्तिक सल्ला असल्याचंही चव्हाण यावेळी म्हणाले. मात्र, चव्हाण यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांना समर्थन दिलं.

मोदी सांगून ऐकणार नाहीत- चव्हाण

‘ईव्हीएमवर आजपर्यंत खूप चर्चा झाली. मोठा घोटाळा होत आहे. माझं वैयक्तिक मत आहे की मागणी केल्यानं पंतप्रधान मोदी ती मान्य करणार नाहीत. त्यासाठी त्यांना हरवावं लागेल. आमच्या जाहीरनाम्यात सांगावं लागेल की आमची सत्ता आल्यास आम्ही ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊ’, असं पृथ्वीराज चव्हाण माध्यमांशी बोलताना म्हणाले.

‘भाजपकडून कधी नट्यांचा तर कधी राज ठाकरेंचा वापर’

त्याचबरोबर भाजप ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत आहे, त्याला कसं उत्तर द्यायचं याबाबत चिंतन शिबिरात चर्चा झाल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली. भाजप स्वत: पुढे न येता कधी नट्यांना, तर कधी राज ठाकरेंना पुढे करत आहे. भाजपकडून लोकांना चिथवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ही भाजपची रणनिती असल्याचा आरोप चव्हाण यांना केलाय. अशावेळी कायद्याचा धाक दाखवून अशा लोकांना सरळ केलं पाहिजे, असंही चव्हाण यांनी म्हटलं.