काँग्रेसला जिंकायचेच आहे, पक्षाचे कर्ज फेडण्याची वेळ आली आहे, सोनिया गांधींनी चिंतन शिबिरात टोचले बड्या नेत्यांचे कान

| Updated on: May 13, 2022 | 4:22 PM

काँग्रेसने आपल्याला बरेच काही दिले, त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. आता संघटनेच्या हितासाठी काम करण्याची वेळ आली आहे. या शिबिरात सर्वांनी आपले विचार मांडा, खुलेपणाने त्यावर चर्चा करा. मात्र निश्चय, संघटनेची मजबुती आणि एकता हाच संदेश बाहेर जायला हवा

काँग्रेसला जिंकायचेच आहे, पक्षाचे कर्ज फेडण्याची वेळ आली आहे, सोनिया गांधींनी चिंतन शिबिरात टोचले बड्या नेत्यांचे कान
sonia udaypur speech
Image Credit source: Twitter
Follow us on

उदयपूर – आपल्याला जिंकायचेच आहे, देशातील जनतेच्या पक्षाकडून मोठ्या अपेक्षा आहेत, या शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उदयपुरात सुरु झालेल्या काँग्रेस चिंतन शिबिराची सुरुवात केली आहे. काँग्रेस पक्षाने आपल्याला बरेच काही दिले आहे, आता त्या कर्जाची परतफेड करण्याची वेळ आली, असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचे कानही टोचले आहेत. राजस्थानात उदयपूरमध्ये आजपासून काँग्रेसच्या चिंतन शिबिरीला सुरुवात झाली. त्याच्या उद्घाटनाच्या सत्रात सोनिया गांधी बोलत होत्या. पक्ष ज्या सुवर्णस्थितीला होता, त्या स्थितीला परत आणण्याचा निश्चय कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना करायचा आहे. असे त्यांनी सांगितले

काय म्हणाल्या सोनिया गांधी

काँग्रेसने आपल्याला बरेच काही दिले, त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. आता संघटनेच्या हितासाठी काम करण्याची वेळ आली आहे. या शिबिरात सर्वांनी आपले विचार मांडा, खुलेपणाने त्यावर चर्चा करा. मात्र निश्चय, संघटनेची मजबुती आणि एकता हाच संदेश बाहेर जायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आत्मपरिक्षण करीत आहोत

आम्हाला मिळालेल्या अपयशाची आम्हाला जाणीव आहे. आगामी काळात करावे लागणारे संघर्ष आणि कठीण स्थिती याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. देशाच्या राजकारणात पक्षाला पुन्हा त्या ठिकाणी आणू, जी भमिका आम्ही सदैव निभावली आहे. ज्या काँग्रेसच्या भूमिकेची आशा देशातील जनतेला आहे. आम्ही आत्मनिरीक्षण करीत आहोत. इथून बाहेर पडताना आत्मविश्वास आणि वचनबद्धता घेऊन इथून बाहेर पडू, असो सोनिया गांधी म्हणाल्या.

पक्षात सुधारणांची गरज

सध्या असाधारण परिस्थितीला पक्षआला सामोरे जावे लागत आहे. संघटनेला जिवंत ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांत जोश येणे गरजेचे आहे. सध्या पक्षात सुधारणांची गरज आहे. संघटनेच्या रचनेतील बदल, रणनीतीतील बदल करण्याची गरज आहे. दैनंदिन कामकाजातही बदल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. पक्षाचे उत्थान हे सामूहिक प्रयत्नांनीच होऊ शकेल, असेही सोनियांनी सांगितले. हे प्रयत्न टाळता येणारे नाहीत.

भाजपा आणि केंद्रावर टीका

भाजपा देशात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करीत आहे. देशात अल्पसंख्याकांना घाबरवण्यात येते आहे. धर्माच्या नावावर ध्रुवीकरण होते आहे. विविधतेतून एकता हा भारताचा परिचय आहे. अल्पसंख्याक हे देशातील समानतेचा अधिकार असणारे नागरिक आहेत. देशात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यात येते आहे.

नेहरु, गांधींच्या सिद्धांतांना संपवण्याचा प्रयत्न

इतिहास पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. पंडित जवाहरलाल नेहरु यांचे योगदान आणि त्याग योजनाबद्ध रितीने कमी दाखवण्याचा प्रयत्न होतोय. महात्मा गांधींची हत्या करणाऱ्याचा उदोउदो करुन महात्मा गांधींच्या सिद्धांतांना संपवण्याचा प्रयत्न होतो आहे. देशातील जुनी मूल्ये संपवण्यात येतायेत. देशात आणि महिलांत असुरक्षितता आहे. देशातील नागरिकांमध्ये भांडणांसाठी भाजपाकडून प्रयत्न सुरु आहेत, अशा शब्दांत सोनियांनी टीका केली आहे.