Corona Vaccination : केंद्र सरकारकडून रशियाच्या Sputnik V लसीला मंजुरी, लवकरच लसीकरणाला सुरुवात

| Updated on: Apr 12, 2021 | 4:30 PM

केंद्र सरकारने सोमवारी रशियाच्या Sputnik V या कोरोना लसीच्या आत्पकालीन वापराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता भारतात आता कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिननंतर ही तिसरी लस उपलब्ध होणार आहे.

Corona Vaccination : केंद्र सरकारकडून रशियाच्या Sputnik V लसीला मंजुरी, लवकरच लसीकरणाला सुरुवात
Sputnik V कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला भारतात मंजुरी
Follow us on

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरु आहे. असं असलं तरी गेल्या काही दिवसांत देशातील विविध राज्यात लसीची कमतरता जाणवत आहे. अशावेळी केंद्र सरकारने सोमवारी रशियाच्या Sputnik V या कोरोना लसीच्या आत्पकालीन वापराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता भारतात आता कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिननंतर ही तिसरी लस उपलब्ध होणार आहे. Sputnik V ही एस्ट्राजेनेका प्रमाणेच 2 डोस असणारी लस आहे. गेमालेया रिसर्च इंन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी अॅन्ड मायक्रोबायोलॉजीने ही लस उपलब्ध केली आहे. (Sputnik V corona vaccine in Russia approved in India)

Sputnik V लस 91.6 टक्के परिणामकारक?

डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेनं गेल्या आठवड्यात भारतात या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) ने डॉ. रेड्डीसोबत सप्टेंबर 2020 मध्ये भारतात Sputnik V लसीची क्लिनिकल ट्रायल केली होती. Sputnik V च्या वेबसाईटनुसार ही लस 91.6 टक्के परिणामकारक आहे. UAE, भारत, व्हेनेज्यूएला आणि बेलारुस इथं तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल केलं जात आहे.

RDIF ने लसनिर्मितीसाठी हैदराबादेतील डॉ. रेड्डीज प्रयोगशाळा, हेटेरो बायोफार्मा, ग्लँड फार्मा, स्टेलिस बायोफार्मा आणि विक्रो बायोटेक अशा भारतीय फार्मास्टुटिकल कंपन्यांसोबत करार केला होता. भारतात Sputnik V लसीचे 850 मिलियन डोस बनवले जातील, असं सांगण्यात येत आहे.

टाळ्या-थाळ्या खूप झालं, आता व्हॅक्सिन द्या – राहुल गांधी

देशात कोरोनाचा कहर प्रचंड वाढला आहे. दिवसाला दीड दीड लाख नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

385 दिवसातही कोरोना विरुद्धचं युद्ध जिंकता आलेलं नाही. उत्सव, टाळ्या-थाळ्या आता खूप झाल्या. आता लोकांना व्हॅक्सीन द्या, असा खोचक टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. सरकारच्या धोरणांमुळेच देशातील प्रत्येक वर्ग त्रस्त आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. दुसरीकडे लसींची कमतरता जाणवत आहे. शेतकरी-मजदूर संकटात आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. छोटे उद्योग धंदे बंद होत आहेत. मध्यमवर्गही त्रस्त झाला आहे, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्र सरकारला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन, भाजपची गुजरातमधून मोठी घोषणा

व्हेंटिलेटर्स बेड संपले, एका बेडवर दोन रुग्ण, जमिनीवर झोपवून ऑक्सिजन, नागपूरची विदारक स्थिती

Sputnik V corona vaccine in Russia approved in India