President Election : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी; राजनाथ सिंह यांचा शरद पवारांना फोन

| Updated on: Jun 16, 2022 | 11:52 AM

President Election : राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने काल दिल्लीत विरोधकांची एक बैठक पार पडली. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

President Election : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी; राजनाथ सिंह यांचा शरद पवारांना फोन
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी; राजनाथ सिंह यांचा शरद पवारांना फोन
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (President Election) एकच उमेदवार असावा आणि ही निवडणूक बिनविरोध पार पडावी म्हणून भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह (rajnath singh) यांनी याबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. राजनाथ सिंह यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्याशी फोनवरून या संदर्भात चर्चाही केली आहे. तसेच काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, ममता बॅनर्जी, मायावती, अखिलेश यादव, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह अनेक पक्षांच्या नेत्यांशी राजनाथ सिंह यांनी संवाद साधला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत भाजपची असेलली भूमिका विशद करतानाच ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा राजनाथ सिंह यांनी पवारांसह सर्वच नेत्यांकडे व्यक्त केल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, विरोधकांकडून सिंह यांना अद्याप कोणतंही आश्वासन देण्यात आलेलं नाही.

राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने काल दिल्लीत विरोधकांची एक बैठक पार पडली. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. पण शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी गळ घातली. मात्र, पवारांनी नकार दिल्यानंतर महात्मा गांधी यांचे पणतू गोपाल कृष्ण गांधी आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचं नाव समोर आलं. मात्र, त्यावरही सहमती होऊ शकली नाही.

हे सुद्धा वाचा

खरगे म्हणाले प्रस्ताव द्या

ही बैठक सुरू असतानाच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. ही ऐक औपचारिकता होती. त्यातून काहीच साध्य झालेलं नाही. मला राजनाथ सिंह यांनी फोन केला होता. त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीबाबत माझ्याशी चर्चा केली. मात्र, मी जेव्हा प्रस्ताव मागितला तर त्यावर त्यांची काहीच प्रतिक्रिया आली नाही, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. आम्ही एक चांगलं नाव पुढे आणणार आहोत. त्याबाबत कोणताही वाद नसेल. सरकार या नावाचा स्वीकार करेल काय? ही एक औपचारिकता आहे, असंही खरगे म्हणाले.

17 राजकीय पक्ष एकवटले

ममतादीदींनी बोलावलेल्या बैठकीला एकूण 17 पक्षांचे नेते उपस्थित होते. काँग्रेस, सीपीआय, सीपीआय (एम), सीपीआयएमएल, आरएसपी, शिवसेना, एनसीपी, राजद, एसपी, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, जद (एस), डीएमके, आरएलडी, आययूएमएल आणि झामुमोचा समावेश होता. याबैठकीला आप आणि टीआरएसने येणं टाळलं. तर एमआयएमला निमंत्रण देण्यात आलं नव्हतं.

नोटिफिकेशन जारी

देशाच्या 16 व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आळं आहे. त्यानंतर 11 उमेदवारांनी नामांकन अर्ज भरला आहे. त्यापैकी एकाचा अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. नामांकन अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये तिघे तामिळनाडूचे, एक दिल्लीचा आणि दोघे मुंबईचे आहेत.