Devendra Fadnavis: संभाजी छत्रपतींबाबत भाजपचे वेट अँड वॉच; फडणवीस म्हणतात, निर्णय केंद्रीय स्तरावर होतो

Devendra Fadnavis: ज्ञानवापी मशिदीच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं. राजकीय परिणामांचा आम्ही विचार करत नाही. शेवटी आस्थेचा विषय आहे. असे विषय राजकारणाच्या पलिकडे असतात.

Devendra Fadnavis: संभाजी छत्रपतींबाबत भाजपचे वेट अँड वॉच; फडणवीस म्हणतात, निर्णय केंद्रीय स्तरावर होतो
संभाजी छत्रपतींबाबत भाजपचा वेट अँड वॉच; फडणवीस म्हणतात, निर्णय केंद्रीय स्तरावर होतो
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 19, 2022 | 1:04 PM

नवी दिल्ली: स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांनी राज्यसभा निवडणुकीत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी छत्रपती यांना राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) पाठिंबा दिला आहे. तर शिवसेनेने (shivsena) पाठिंबा हवा असेल तर शिवसेनेत या अशी अटच घातली आहे. संभाजी छत्रपतींना आम्ही खूप मदत केली. त्यांच्या प्रत्येक भूमिकेला समर्थन दिला. पण राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवार देणं हा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही उमेदवार देणार आहोत, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे संभाजी छत्रपती यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग खडतर झाला आहे. त्यातच भाजपने आपले पत्ते खोलले नाहीत. भाजपने वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याने संभाजी छत्रपती राज्यसभेवर जाणार की नाही? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे भाजप आगामी काळात काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे संभाजी छत्रपती यांनी सर्व आमदारांना पत्रं लिहून पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी छत्रपती यांना पाठिंबा देण्यावरून अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही संभाजी छत्रपती यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. पण अशा निवडणुकीचा निर्णय राज्य स्तरावर निर्णय होत नाही. केंद्रीय स्तरावर निर्णय होतो. योग्य निर्णय घेतल्यानंतर याबाबत बोलू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राऊत कोण आहेत?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर भाष्य करण्यास नकार दिला. संजय राऊत रोजच टीका करतात. आम्ही महत्त्व देत नाही. त्यांच्यावर भाष्य करायला ते महत्त्वाचे नाही. पुन्हा सांगतो. संजय राऊत कोणी महत्त्वाचे आहेत का? तुमच्याकडे काही प्रश्न असेल तर सांगा त्यावर उत्तर देईल. संजय राऊत कोण आहेत? त्यांच्या प्रश्नावर मी का उत्तर देऊ?

परिणामांचा विचार करत नाही

ज्ञानवापी मशिदीच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं. राजकीय परिणामांचा आम्ही विचार करत नाही. शेवटी आस्थेचा विषय आहे. असे विषय राजकारणाच्या पलिकडे असतात. महत्त्वाचे विषय कोर्टाच्या माध्यमातून सोडवले जातात ही महत्त्वाची गोष्ट आहे. न्यायालयाने कोर्ट कमिश्नर नियुक्त केला आहे. अहवाल येईल त्या आधारावर जो काही निर्णय येईल तो महत्त्वाचा असेल. न्यायालयात प्रकरण असल्याने त्यावर वाद घालण्यात अर्थ नाही. मंदिरावर आक्रमण करून औरंगजेबाने ते तोडले होते. हे सर्वांनाच माहीत आहे, असंही ते म्हणाले.

मी पोस्टर पाहिलं नाही

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मुंबईत पोस्टर लागले आहेत. त्याबाबत त्यांना विचारण्यात आले असता मी पोस्टर पाहिलं नाही. त्यावर रिअॅक्शन देण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.