पश्चिम बंगालमधील 8 आयपीएस अधिकाऱ्यांना ईडीचे समन्स, चौकशीसाठी दिल्लीला बोलावले
पश्चिम बंगालमधील काही घोटाळ्यांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे. यामध्ये कोळसा तस्करी प्रकरणी आणि शिक्षक भरती घोटाळ्याचा समावेश आहे. गेल्या वर्षीही सीबीआयने तीन आयपीएस अधिकाऱ्यांना चौकशीसाठी दिल्लीत बोलावले होते.
नवी दिल्लीः अंमलबजावणी संचालनालय (Directorate of Enforcement) म्हणजेच ईडीकडून पश्चिम बंगालमधील 8 आयपीएस (8 IPS Officer) अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहे. या सगळ्या अधिकाऱ्यांना ईडीने चौकशीसाठी (ED Enquiry) दिल्लीला बोलावून घेण्यात आले आहे. कोळसा घोटाळ्याप्रकरणी या पोलीस अधिकाऱ्यांची ईडी चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सुकेश जैन, ज्ञानवंत सिंग, राजीव मिश्रा, श्याम सिंग, सेल्वा मुरुगन, कोटेश्वर राव या अधिकाऱ्यांना दिल्लीला बोलवण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांची बेकायदा कोळसा उत्खननाच्या वेळी त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील काही घोटाळ्यांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे. यामध्ये कोळसा तस्करी प्रकरणी आणि शिक्षक भरती घोटाळ्याचा समावेश आहे. गेल्या वर्षीही सीबीआयने तीन आयपीएस अधिकाऱ्यांना चौकशीसाठी दिल्लीत बोलावले होते.
Coal Scam case | Eight IPS officers of West Bengal, including Sukesh Jain, Gyanwant Singh, Rajib Mishra, Shyam Singh, Selva Murugan, Koteshwar Rao summoned by Enforcement Directorate in Delhi next week.
— ANI (@ANI) August 11, 2022
दुसरीकडे गोवंश तस्करी प्रकरणाच्या तपासात सहकार्य केले नसल्याच्या कारणावरून सीबीआयमार्फत तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनुब्रत मोंडल यांनाही गुरुवारी त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयचे एक पथक गुरुवारी पहाटे टीएमसीचे बीरभूमचे जिल्हाध्यक्ष मंडल यांच्या घरी पोहचून सुमारे एक तास चौकशी करण्यात आली, त्यानंतर त्यांना अटक केल्याचे अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले.
पार्थ चॅटर्जी आणि अर्पिताची अटक
शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या ईडीकडून काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालचे माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांना अटक करण्यात आली होती. यावेळी अर्पिताकडून कोट्यवधी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली असून दोघांना कोलकाता येथील विशेष न्यायालयाकडून 18 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश जीवन कुमार साधू यांनी ईडीच्या विनंतीवरून चॅटर्जी आणि मुखर्जी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
माजी मंत्र्यांना अटक
माजी मंत्र्यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांनी जामीन अर्ज केला होता मात्र तो फेटाळण्यात आला होता. त्यानंतर चॅटर्जी आणि मुखर्जी यांना 18 ऑगस्ट रोजी पुन्हा सुनावणीसाठी हजर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. माजी मंत्र्यांचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाकडून स्प्ष्ट करण्यात आले होते की, त्यांच्यावरील आरोप गंभीर आहेत आणि ईडीच्या ताब्यात असताना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोने, मालमत्तेची कागदपत्रे, बँक खात्याचे तपशील आणि इतर कागदपत्रे सापडली असून त्यांची कसून चौकशी करण्यात यावी.