Ghaziabad Journalist Murder | भाचीच्या छेडछाडीची तक्रार दिल्याचा राग, मुलींसमोर गुंडांचा गोळीबार, पत्रकाराचा मृत्यू

आपल्या भाचीशी छेडछाड केल्याची तक्रार विक्रम जोशी यांनी पोलिसांकडे दिली होती. याचा सूड घेण्यासाठीच गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप जोशी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे

Ghaziabad Journalist Murder | भाचीच्या छेडछाडीची तक्रार दिल्याचा राग, मुलींसमोर गुंडांचा गोळीबार, पत्रकाराचा मृत्यू
| Updated on: Jul 22, 2020 | 3:48 PM

नवी दिल्ली : गुंडांच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले गाझियाबादमधील पत्रकार विक्रम जोशी यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. भाचीशी छेडछाड केल्याची पोलिसात तक्रार केल्याने विक्रम जोशी यांच्यावर सोमवारी रात्री हल्ला करण्यात आला होता. जोशींना त्यांच्या मुलींच्या डोळ्यादेखत गोळी घालण्यात आली होती. (Ghaziabad Journalist Vikram Joshi Murder)

या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर एक आरोपी फरार आहे.

आपल्या भाचीशी छेडछाड केल्याची तक्रार विक्रम जोशी यांनी पोलिसांकडे दिली होती. याचा सूड घेण्यासाठीच गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप जोशी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेळेवर कारवाई न केल्याचा दावाही नातेवाईकांनी केला आहे.

विक्रम जोशी सोमवारी रात्री आपल्या मुलींसोबत दुचाकीवरुन जात होते. वाटेत बदमाशांनी त्यांना थांबवून मारहाण केली आणि त्यांच्या डोक्यात गोळी मारल्याचा आरोप आहे. या गुंडांनीच भाचीशी छेडछाड केल्याची तक्रार विक्रम जोशी यांनी पोलिसात केली होती.

हेही वाचा : सासूकडून सतत टोमणे, कंटाळलेल्या सूनेकडून बॅटने हत्या

दरम्यान, निष्काळजी केल्याबद्दल प्रताप विहार चौकीचे प्रभारी राघवेंद्र सिंग यांना निलंबित करण्यात आले आहे. जोशी यांच्या कुटुंबीयांना सरकारने 10 लाख रुपये, त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी आणि मुलांना मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.

रामराज्याचे आश्वासन दिले, मात्र गुंडाराज पाहायला मिळत आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

यूपीमध्ये जंगलराज इतके वाढले आहे, की तक्रार केल्यावरही सामान्य माणसांना गुंडांच्या त्रासाची भीती सतावते, असा घणाघात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केला आहे.

मुख्य आरोपीला पकडल्याशिवाय आम्ही मामाचा मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका पत्रकार विक्रम यांच्या भाच्याने घेतली

Follow Us