Hardik Patel Resigns: देश संकटात तेव्हा नेते विदेशात, ज्येष्ठ नेते मोबाईलमध्ये व्यस्त; जाता जाता हार्दिक पटेलांनी दाखवला काँग्रेसला आरसा

| Updated on: May 18, 2022 | 11:40 AM

कोणत्याही मुद्द्याकडे गांभीर्याने न पाहणं हा वरिष्ठ नेतृत्वाचा सर्वात मोठा दोष आहे. मी जेव्हा जेव्हा पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटलो.

Hardik Patel Resigns: देश संकटात तेव्हा नेते विदेशात, ज्येष्ठ नेते मोबाईलमध्ये व्यस्त; जाता जाता हार्दिक पटेलांनी दाखवला काँग्रेसला आरसा
जाता जाता हार्दिक पटेलांनी दाखवला काँग्रेसला आरसा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अहमदाबाद: हार्दिक पटेल(Hardik Patel)   यांनी काँग्रेसच्या (congress) पद आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे गुजरात काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हार्दिक पटेल गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज होते. पक्षातील राज्य नेतृत्वावर त्यांची खास नाराजी होती. त्यामुळे अखेर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पटेल यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून राजीनामा दिला आहे. मात्र, जाता जाता त्यांनी काँग्रेसला आरसा दाखवला आहे. जेव्हा जेव्हा ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना भेटलो, तेव्हा तेव्हा त्यांच्यासमोर गुजरातच्या समस्या मांडल्या. त्या त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते समस्या ऐकण्याऐवजी मोबाईलमध्ये व्यस्त होते. जेव्हा जेव्हा देश संकटात सापडला. तेव्हा काँग्रेस नेते विदेशात होते, अशी टीका करतानाच भाजप (bjp) विरोध या पलिकडे काँग्रेसने काही केलं नाही. विकासाचा रोडमॅप काँग्रेस देऊ शकली नाही, असा हल्लाबोलही हार्दिक पटेल यांनी केला आहे. हार्दिक पटेल यांनी आपलं हे स्फोटक पत्रं ट्विटरवर पोस्ट केलं आहे.

कोणत्याही मुद्द्याकडे गांभीर्याने न पाहणं हा वरिष्ठ नेतृत्वाचा सर्वात मोठा दोष आहे. मी जेव्हा जेव्हा पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटलो. त्यांचं लक्ष गुजरातकडे वेधण्याचा प्रयत्न केला. गुजरातमधील समस्यांवर त्यांचं लक्ष्य केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेव्हा त्यांचं लक्ष आपल्या मोबाईलमध्ये होतं. किंवा इतर गोष्टींकडे. जेव्हा जेव्हा देश संकटात सापडला आणि अशावेळी काँग्रेस नेतृत्वाची गरज भासली तेव्हा आमचे नेते विदेशात होते. गुजरात आणि गुजराती माणसांबद्दल द्वेष असावा, अशीच ज्येष्ठ नेत्यांची मानसिकता पाहायला मिळाली, अशी टीका हार्दिक पटेल यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

 

म्हणून जनतेने काँग्रेसला हद्दपार केलं

आपण 21 व्या शतकात आहोत. भारत हा देशातील सर्वात तरुण देश आहे. देशातील तरुणांना एक सक्षम आणि मजबूत नेतृत्व हवं आहे. काँग्रेस पक्ष केवळ विरोधाच्या राजकारणापुरती मर्यादित राहिल्याचं गेल्या तीन वर्षापासून मी पाहत आहे. देशातील लोकांना केवळ विरोध नकोय. त्यांना देशाच्या भविष्याबाबत विचार करणारं नेतृत्व हवं आहे. अयोध्येतील राम मंदिर असो, सीएए-एनआरसीचा मुद्दा असेल, काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा विषय असेल अथवा जीएसटीचा निर्णय असेल, या सर्व विषयावर देशातील लोकांना तोडगा हवा होता. मात्र, काँग्रेस पक्षाने यात केवळ अडथळा बनण्याचं काम केलं. देश असो, गुजरात असो किंवा पटेल समाज असो काँग्रेसने केवळ केंद्र सरकारला विरोध करण्यापलिकडे काही केलं नाही. त्यामुळेच देशातील जनतेने जवळपास संपूर्ण देशातून काँग्रेसला हद्दपार केलं. कारण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना साधा बेसिक रोडमॅपही देता आला नाही, असं हार्दिक पटेल यांनी पत्रात नमूद केलं आहे.

हा तर गुजराती जनतेचा विश्वासघात

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी जाणूनबुजून गुजरातच्या जनतेला कमजोर केलं. त्याबदल्यात स्वत:चं आर्थिक हित साधलं हे सांगताना अत्यंत दु:ख होत आहे. राजकीय विचारधारा वेगळी असू शकते. पण काँग्रेस नेत्यांचं असं विकलं जाणं हा म्हणजे राज्यातील जनतेचा विश्वासघातच आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.