Hardik Patel Resigned: हार्दिक पटेल भाजपच्या रथावर स्वार होणार?, 28 मे रोजी मोदींच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाची शक्यता

| Updated on: May 18, 2022 | 1:52 PM

Hardik Patel Resigned: राजीनामा देताना हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर अनेक आरोप केले आहेत. काँग्रेस पक्ष देश आणि समाजहिताच्या विपरीत काम करत आहे. केवळ विरोधाचं राजकारण करण्यापलिकडे काँग्रेसचं राजकारण उरलं नाही.

Hardik Patel Resigned: हार्दिक पटेल भाजपच्या रथावर स्वार होणार?, 28 मे रोजी मोदींच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाची शक्यता
हार्दिक पटेल भाजपच्या रथावर स्वार होणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अहमदाबाद: हार्दिक पटेल (Hardik Patel resigned from Congress) यांनी काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता ते कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. येत्या 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) राजकोटला एका रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी येत आहेत. त्याचवेळी हार्दिक पटेल हे मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर याबाबत हार्दिक पटेल निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, हार्दिक पटेल यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. तसेच पटेल यांनी ट्विट करून राजीनामा पत्रं शेअर केलं आहे. आज हिंमत करून मी काँग्रेस पक्षाचं पद आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. माझे सहकारी आणि गुजरातची जनता माझ्या या निर्णयाचं स्वागत करेल याची मला आशा आहे. माझ्या या निर्णयानंतर मी गुजरातसाठी काही सचेत आणि सकारात्मक कार्य करू शकेल याचा मला विश्वास आहे, असं हार्दिक पटेल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

हे सुद्धा वाचा

राजीनामा देताना हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर अनेक आरोप केले आहेत. काँग्रेस पक्ष देश आणि समाजहिताच्या विपरीत काम करत आहे. केवळ विरोधाचं राजकारण करण्यापलिकडे काँग्रेसचं राजकारण उरलं नाही. काँग्रेसने राम मंदिर निर्मिती, सीएए एनआरसी, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि जीएसटी लागू करणे आदी मुद्द्यांना विरोध केला. जेव्हा देश संकटात सापडला, तेव्हा काँग्रेस नेतृत्वाची गरज असताना काँग्रेस नेते मात्र विदेशात होते, अशी टीका पटेल यांनी पक्ष नेतृत्वावर केली आहे.

राज्य नेतृत्वावर नाराज

हार्दिक पटेल गेल्या काही महिन्यांपासून पक्षावर नाराज होते. पक्षातील राज्य नेतृत्वावर त्यांची विशेष नाराजी होती. याबाबत त्यांनी हायकमांडकडेही अनेकदा तक्रारी केल्या होत्या. गुजरात विधानसभा निवडणुकीला अवघा महिना बाकी आहे. त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. मला काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष बनवलं. पण मला कोणतीच जबाबदारी दिली नाही. मला सातत्याने डावललं गेलं. मी काँग्रेस सोडावी असंच राज्यातील नेतृत्वाला वाटत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. राज्यात काँग्रेस अत्यंत कमकुवत आहे. तसेच काँग्रेस जिंकेल अशी स्थिती नाहीये, असंही त्यांनी म्हटलं होतं.