‘कमरेत प्रचंड वेदना, आसन व्यवस्था बदलली अन् लोकांनी केले ट्रोल’, सरन्यायाधीशांनी सांगितला तो किस्सा

| Updated on: Mar 24, 2024 | 2:08 PM

CJI D Y Chandrachud : सरन्यायाधीशांनी आसन व्यवस्था बदलल्याचे कोण काहूर माजले. त्यावरुन निरर्थक चर्चा सुरु झाल्या. त्यांना ट्रोल करण्यात आले. जागा बदलण्याचं कारण न समजून घेताच आरोपांची राळ उठल्याने व्यथित झालेल्या सरन्यायाधीशांनी अंतरीच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

कमरेत प्रचंड वेदना, आसन व्यवस्था बदलली अन् लोकांनी केले ट्रोल, सरन्यायाधीशांनी सांगितला तो किस्सा
सरन्यायाधीशांनी ट्रोलर्सला असे दिले उत्तर
Image Credit source: गुगल
Follow us on

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड (CJI D Y Chandrachud) यांचा न्यायालयीन प्रक्रियेत सुधारणा आणि तंत्रज्ञानासह आधुनिकता आणण्यात सिंहाचा वाटा आहे, असे म्हटल्यास वावगं ठरु नये. मोठ्या पदावरील व्यक्तीच्या वेदना कोणाला दिसत नाहीत. याविषयीचा किस्सा दस्तूरखुद्द सरन्यायाधीशांनीच कथन केला. एका सुनावणीच्या लाईव्ह स्ट्रीमिंगदरम्यान त्यांनी आसन व्यवस्थेत थोडा बदल केला. त्यामागील कारण समजून न घेता सरन्यायाधीशांना ट्रोल करण्यात आले. ते गर्विष्ठ असल्याचे लेबल लावून समाज माध्यमांवर काहींनी त्यांना लक्ष्य केले. सरन्यायाधीशांनी आता या सर्व वादावर त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

नेमकं काय घडलं

एका महत्वपूर्ण प्रकरणावर सुनावणी सुरु होती. त्याचे लाईव्ही स्ट्रीमिंग सुरु होते. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांच्या पाठीत कळ उठली. त्यामुळे त्यांनी खुर्ची थोडी सरकावली. त्यावरुन समाज माध्यमांवर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. काहींनी तर त्यांना गर्विष्ठ असल्याचा आरोप केला. तर काहींनी ते महत्वपूर्ण सुनावणी सुरु असताना मधातूनच उठून गेल्याचा कांगावा केला.

हे सुद्धा वाचा

आम्ही जे काम करतो, त्यावर लोकांचा विश्वास

आम्ही कोणत्या परिस्थितीत काम करतो, हे ट्रोलर्सला माहिती नसते. 24 वर्षांपासून न्याय सेवेत राहाणे थोडे अवघड होते. पण मी माघारी फिरलो नाही. मी न्यायापालिका सोडली नाही. मी केवळ माझी जागा बदलली. पण यामुळे मला गैरवर्तनाचा आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पण मला विश्वास आहे की, आमचे खांदे रुंद आहेत. आम्ही डगमगणार नाही. आम्ही जे काम करतो, त्यावर लोकांचा विश्वास आहे, अशा अनुरुप शब्दात त्यांनी ट्रोलर्स हेटाळणीखोरांना प्रत्युत्तर दिले.

तणाव व्यवस्थापन न्यायाधीशासाठी महत्वाचे

तणाव व्यवस्थापन क्षमता न्यायाधीशाच्य जीवनात महत्वपूर्ण आहे. खासकरुन जिल्हा न्यायाधीशांसाठी अत्यंत आवश्यक आहे. तणावाचे व्यवस्थापन करणे आणि कार्य जीवनात संतुलन ठेवण्याची कला, क्षमता या वेगळ्या नाहीत. त्या तर न्याय दान प्रक्रियेशी निगडीत आहेत. दुसऱ्यांना ठीक करण्याअगोदर आपल्याला अगोदर ठीक करण्याविषयी विचार करावा लागेल. बेंगळुरु येथील न्यायिक अधिकाऱ्यांच्या 21 व्या द्विवार्षिक राज्यस्तरीय संमेलनाचे त्यांनी उद्धघाटन केले. या कार्यक्रमात सरन्यायाधीशांनी विविध विषयांवर दिलखुलास संवाद साधला.