
महाराष्ट्रासह देशातील 11 राज्यांवर अवकाळी पावसाचे संकट ओढावले आहे. आज राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागात पावसाच्या धारा कोसळल्या. काल रात्रीही पाऊस पडल्यामुळे आज सकाळी हवेत गारवा पहायला मिळाला. तसेच हलक्या वाऱ्यांमुळे थंडी वाढली आहे. 30 जानेवारी रोजी सक्रिय झालेल्या पश्चिमी विक्षोभामुळे हवामान खात्याने 1 फेब्रुवारीला पावसाचा इशारा जारी केला होता. आता 2 फेब्रुवारी रोजी आणखी एक पश्चिमी विक्षोभ सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 5 फेब्रुवारीपर्यंत उत्तर महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत सध्या कमाल तापमान 21.5 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 12.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. आता पुढील पाच दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तसेच सकाळच्यावेळी हलके धुके देखील पडण्याची शक्यता आहे. पश्चिमी विक्षोभामुळे दिल्लीच्या हवामानावर परिणाम होणार आहे. यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या दोन पश्चिमी विक्षोभांमुळे पश्चिम हिमालयात हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच वायव्य भारत आणि मध्य भारतातील मैदानी भागातही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिसरा पश्चिमी विक्षोभ 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान सक्रिय होणार आहे. यामुळे पंजाब, हरियाणाच्या काही भागात 7 फेब्रुवारीपर्यंत दाट धुके पडण्याची शक्यता आहे. यानंतरच्या काळातही तापमानात घट जाणवण्याची शक्यता आहे.
हवामान विभानाने पुढील दोन दिवस जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याती आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच याच काळात पंजाब, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम उत्तर प्रदेशात वादळासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात काळात पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये गारपीट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
पुढील दोन दिवस सकाळी आणि रात्री पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, आसाम, मेघालय, पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्कीम आणि ओडिशामध्येही धुके पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने लोकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.