PM Modi speech: ‘सबका साथ, सबका विकास’ आणि आता ‘सबका प्रयास’, पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवी घोषणा

| Updated on: Aug 15, 2021 | 8:13 AM

PM Modi speech | भारताच्या 100व्या स्वातंत्र्यदिनासाठी आपण आतापासूनच काही संकल्प केले पाहिजेत. बदलत्या युगानुसार नागरिकांनीही स्वत:मध्ये बदल केले पाहिजेत. भारताचा 100 वा स्वातंत्र्यदिन साजरा होईल तेव्हा देश पायाभूत सुविधा आणि अन्य सुविधांच्याबाबत पुढारलेला असला पाहिजे. सरकारला विनाकारण नागरिकांच्या आयुष्यात हस्तक्षेप करायला लागू नये, असा संकल्पही आपण करुयात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

PM Modi speech: सबका साथ, सबका विकास आणि आता सबका प्रयास, पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवी घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

नवी दिल्ली: भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नवी घोषणा दिली. आजपर्यंत आपण ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या धोरणानुसार चालत होतो. मात्र, आता बदलती परिस्थिती पाहता ‘सबका प्रयास’ हा आणखी एक घटक त्यामध्ये जोडावा लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. भारताच्या 100व्या स्वातंत्र्यदिनासाठी आपण आतापासूनच काही संकल्प केले पाहिजेत. बदलत्या युगानुसार नागरिकांनीही स्वत:मध्ये बदल केले पाहिजेत. भारताचा 100 वा स्वातंत्र्यदिन साजरा होईल तेव्हा देश पायाभूत सुविधा आणि अन्य सुविधांच्याबाबत पुढारलेला असला पाहिजे. विकासाची गंगा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे. हा विकास सर्वांगीण आणि सर्वस्पर्शी असावा. सरकारला विनाकारण नागरिकांच्या आयुष्यात हस्तक्षेप करायला लागू नये, असा संकल्पही आपण करुयात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

आपल्या भाषणच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडुंचे स्वागत केले. या खेळाडुंनी केवळ आपली मनं जिंकलेली नाहीत तर त्यांनी भविष्यातील नव्या पिढीली प्रेरणा दिली आहे. त्यासाठी आपण त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करुयात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा भारतीयांनी कोरोनाशी दिलेल्या लढ्याचे कौतुक केले. संपूर्ण जगासमोर आजघडीला कोरोनाचं आव्हान आहे. पण भारतीयांनी संयम, धैर्य आणि असाधारण गतीने काम केले. ही समाधानाची बाब असली तरी ही स्वत:ची पाठ थोपटून निश्चिंत होण्याची वेळ नाही. मात्र, त्याचवेळी भारतासमोर कोणतेही आव्हान नव्हते असे म्हणण्याचा करंटेपणा भविष्यातील विकासातील अडथळा ठरेल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

भारताने कोरोना लस तयार केली नसती तर काय झालं असतं?

कोरोनाच्या काळात भारतीय वैज्ञानिकांनी उत्तम काम केले. कोरोना लसीसाठी आपल्याला दुसऱ्या देशावर अवलंबून राहावे लागत नाही. फक्त विचार करा की, आज आपल्याकडे स्वदेशी कोरोना लस नसती तर काय झाले असते? भारतात पोलिओची लस येण्यासाठी कित्येक वर्ष लागल्याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुन दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे

* देशाच्या संरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांना, स्वातंत्र्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांना नमन. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना देश आठवत आहे. या सर्वांना वंदन करतो.

* देशात पूर आणि भूस्खलनाच्या दुर्दैवी घटना घडल्यात. या घटनांमध्ये प्रभावित सर्वांसोबत केंद्र सरकार उभं आहे.

* उज्वला योजनेपासून आयुष्मानपर्यंत योजनांची ताकद सर्वसामान्यांना माहिती आहे. मात्र, इतक्यावरच थांबायचं नाहीये. 100 टक्के गावांमध्ये रस्ते असावेत, सर्वांकडे बँक खाते असावेत, सर्वांकडे आयुष्मान कार्ड असावे, घरकुल योजनेतून प्रत्येक हक्काच्या व्यक्तीला घर द्यायचं आहे.

* देशातील प्रत्येकापर्यंत चांगल्या आरोग्याची व्यवस्था पोहचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी आयुष्मान भारत योजनेत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहचवल्या जात आहेत, नागरिकांना स्वस्त औषधं उपलब्ध करुन दिले जात आहे. आता ब्लॉक स्तरावर आधुनिक रुग्णालयं उभे करण्यावर भर दिला जात आहे. पुढील काळात रुग्णालयांकडे स्वतःचे ऑक्सिजन प्लांट असतील.

* देशात भांडवलशाही आणि समाजवादाची खूप चर्चा होते. पण देशात सहकारवादाचीही गरज आहे. यामुळे देशातील जनता विकासाचा भाग बनावा म्हणून सहकार क्षेत्र महत्त्वाचं आहे. सहकार हे एक संस्कार, प्रेरणा आणि सोबत चालण्याची वृत्ती आहे. म्हणूनच स्वतंत्र सहकार मंत्रालय बनवण्यात आलं.

* वाढत्या लोकसंख्यामुळे कुटुंबात विभागणी होऊन गावांमध्ये शेतकऱ्यांकडील जमिनीचं प्रमाण कमी होतंय. हे मोठं आव्हान आहे. सध्या देशात 80 टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे. या अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे जितकं लक्ष द्यायला हवं होतं तितकं आधी दिलं गेलं नाही. आत्ता या शेतकऱ्यांवर लक्ष दिलं जातंय.