भारताने फनी वादळालाही हरवलं, नियोजनावर संयुक्त राष्ट्र फिदा
नवी दिल्ली : भीषण चक्रीवादळ सायक्लोन फनीमुळे ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मोठं आर्थिक नुकसान झालंय. पण एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांनी ज्या पद्धतीने या परिस्थितीचा सामना केला ते पाहून संपूर्ण जग थक्क झालंय. उद्ध्वस्त करणाऱ्या चक्रीवादळांचा सामना कसा करायचा असतो, याचं उदाहरण ओदिशामध्ये पाहायला मिळालं. संयुक्त राष्ट्राने (यूएन) भारताच्या या यशस्वी नियोजनाचं जोरदार कौतुक केलंय. जगभरात […]
नवी दिल्ली : भीषण चक्रीवादळ सायक्लोन फनीमुळे ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मोठं आर्थिक नुकसान झालंय. पण एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांनी ज्या पद्धतीने या परिस्थितीचा सामना केला ते पाहून संपूर्ण जग थक्क झालंय. उद्ध्वस्त करणाऱ्या चक्रीवादळांचा सामना कसा करायचा असतो, याचं उदाहरण ओदिशामध्ये पाहायला मिळालं. संयुक्त राष्ट्राने (यूएन) भारताच्या या यशस्वी नियोजनाचं जोरदार कौतुक केलंय. जगभरात शेकडो लोकांचे बळी घेणाऱ्या वादळासारखंच हे वादळ होतं, पण यशस्वी नियोजनामुळे परिस्थिती हाताळता आली, असं यूएनने म्हटलंय. 1999 मध्ये ओदिशात आलेल्या वादळामुळे सुपर सायक्लोन वादळामुळे 10 हजारांपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता. यावेळी 12 जणांना जीव गमवावा लागला.
ओदिशा सरकारने ताकद पणाला लावली, केंद्र सरकारनेही साथ दिली
ओदिशा सरकारने लोकांना सतर्क करण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली. वादळापूर्वी जवळपास 26 लाख मेसेज प्रत्येकाच्या मोबाईलवर पाठवण्यात आले होते. 43 हजार स्वयंसेवक, एक हजार आपत्कालीन कर्मचारी, टीव्हीवर जाहिरातील, समुद्र किनारी भागात अलार्म, ठिकठिकाणी बस सेवा, पोलीस अधिकारी आणि घोषणा या ताफ्यासह राज्य सरकारने या विध्वंसक वादळाला तोंड दिलं. केंद्र सरकारनेही लागेल ती मदत देत ओदिशा सरकारला साथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरिय बैठक घेत तातडीने कामाला लागण्याच्या सूचना केल्या.
20 वर्षांपूर्वी विध्वंसक वादळ
खरं तर सरकारकडून एवढी अपेक्षाच केली नव्हती, असं स्थानिक सांगतात. त्यामुळे जे नियोजन केलं, ते जगासमोर उदाहरण निर्माण करणारं ठरलं आहे. 20 वर्षांपूर्वी ओदिशात आलेल्या वादळापेक्षा ही परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी हजारो लोकांचा जीव गेला होता, तर अनेक जण बेपत्ता झाले होते. अधिकाऱ्यांच्या मते, हे एक दिवसाचं काम नाही. यासाठी आम्ही 20 वर्ष खर्च केले आहेत, असं अधिकारी सांगतात.
निवारा गृहांमध्ये लाखो लोकांची व्यवस्था
वादळामध्ये सुरक्षित ठिकाणी निवारा गृहांची निर्मिती केली जाते. हे निवारा गृह पीडितांसाठी वरदान ठरतात. वादळाचा सामना करण्यासाठी स्थानिक यंत्रणा आणि एनडीआरएफची टीम सक्रिय झाली होती. एनडीआरएफच्या जवळपास 65 टीम तैनात होत्या. प्रत्येक टीममध्ये 45 जवान होते. ओदिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये गेल्या तीन दिवसांपासून रस्ते दुरुस्ती आणि लोकांना मदत करण्यासाठी या यंत्रणांनी कंबर कसली. नौसेनेने सहा जहाजं दिले, शिवाय वैद्यकीय पथकं तैनात होती, याशिवाय भारतीय वायूदलाने दोन सी-17, दोन सी-130 आणि चार एएन-32 विमानं स्टँडबाय ठेवली होती.
संयुक्त राष्ट्राकडून नियोजनाला कामाची पावती
संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीने भारतीय हवामान विभागाच्या अचूक अंदाजाचं कौतुक केलंय. योग्य वेळी सूचना दिल्यामुळे ओदिशामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी टाळता आली. भारताने कमीत कमी नुकसान करत परिस्थीतवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलंय, असं UNISDR च्या प्रमुख मामी मिझोटरी यांनी म्हटलंय.
India's zero casualty approach to managing extreme weather events is a major contribution to the implementation of the #SendaiFramework and the reduction of loss of life from such events. I look forward to hearing more about #CycloneFani at the #GP2019Geneva May 13-17. https://t.co/AqwCwNRjxE
— Mami Mizutori (@HeadUNDRR) May 3, 2019
आतापर्यंतची सर्वात मोठी वादळं
फनी वादळापूर्वी भारतात आलेल्या वादळांनी मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी केली आहे. 1988 रोजी 14B नावाच्या वादळाने 29 नोव्हेंबर रोजी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या सीमेवर धडक दिली. या वादळात 6240 जणांचा जीव गेला. 1990 मध्ये आंध्र प्रदेशात सुपर सायक्लोनने 9 मे रोजी धडक दिली, ज्यात 967 जणांचा मृत्यू झाला. 4 डिसेंबर 1993 रोजी पुद्दुचेरीच्या वादळात 70 जणांचा जीव गमवावा लागला. 2000 साली 29 नोव्हेंबर रोजी BOB 25 नावाच्या वादळाने 12 जणांचा जीव घेतला, तर मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. 2013 मध्ये 12 ऑक्टोबर रोजी फालिन नावाच्या वादळाने 30 जणांचा जीव घेतला. 2014 मध्येही मोठं वादळ आलं, पण योग्य नियोजनामुळे कमीत कमी नुकसान झालं.