
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला होता, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी मोठा दावा केला आहे, भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई करण्यात आली, भारतानं सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती दिली होती, तसेच पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले होते, त्यांना देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले. एवढंच नाही तर पाकिस्तानसोबतचा व्यापर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे, आयात -निर्यातीवर देखील बंदी घालण्यात आल्यानं आधीच भारतानं पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या होत्या.
त्यानंतर भारतानं पीओके आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. ज्यामध्ये पीओकेमधील पाच तर पाकिस्तानमधील चार दहशतवादी अड्ड्यांचा समावेश होता, भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला. पाकिस्तानकडून देखील भारतावर हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र भारतानं हे हल्ले परतून लावले, त्यानंतर भारतानं प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानवर ड्रोन हल्ला केला होता, पाकिस्तानच्या 15 शहरांवर 50 ड्रोन हल्ले करण्यात आले, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची संपूर्ण रडार सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आली होती, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं.
दरम्यान त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकेनं यशस्वी मध्यस्थी केली आहे. भारत आणि पाकिस्तानने युद्धविरामाला संमती दर्शवली आहे, आज पाच वाजेपासून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र युद्धविराम करतानाच दहशतवादी कारवांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल, दहशतवाद्यांविरोधात भारत कुठलीही तडजोड करणार नाही अशी घोषणा भारताच्या वतीनं यावेळी करण्यात आली आहे. युद्धविराम झाला आहे. त्यानंतर आता 12 मे रोजी दोन्ही देशाचे डीजीएमओ चर्चा करणार आहेत. भारतानं आपल्या अटींवर युद्धविरामाला संमती दर्शवली.