कोरोनामुळे 47 लाख मृत्यू, WHOच्या डेथ रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा, मग सरकारी आकडेवारी कमी कशी?

| Updated on: May 06, 2022 | 8:58 AM

भारतामध्ये कोरोनामुळे 47 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने करण्यात आला होता. मात्र हा दावा भारताने फेटाळून लावला असून, 'WHO'चे गणितीय मॉडेल संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.

कोरोनामुळे 47 लाख मृत्यू, WHOच्या डेथ रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा, मग सरकारी आकडेवारी कमी कशी?
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्ली : देशात गेले दोन वर्ष कोरोना (Corona) संकट होते. या काळात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. जानेवारी 2020 ते डिसेंबर 2021 दरम्यान भारतामध्ये कोरोनामुळे तब्बल 47 लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. मृत्यूचा हा आकडा भारताने जाहीर केलेल्या अधिकृत आकडल्यापेक्षा दहा पटीने अधिक असल्याचा गंभीर आरोप जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वतीने करण्यात आला आहे. भारताने कोरोनामुळे देशात आतापर्यंत 4,81,000 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी जाहीर केली आहे. जागतिक स्थराचा विचार केल्यास जगात जेवढे मृत्यू झाले त्या पैकी एक तृतीयांश मृत्यू हे एकट्या भारतात झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेचा हा दावा भारताने फेटाळून लावला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या मोजण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने जे गणितीय मॉडेल, जी मापण पद्धत तयार करण्यात आली आहे, त्या मॉडलवरच भारत सरकारने (Central government) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डब्लूएचओचे कोरोना रुग्णांचा मृत्यू मोजण्याचे जे मॉडेल आहे ते शंकास्पद असल्याचे भारताने म्हटले आहे.

भारताने नेमके काय म्हटले

कोरोना काळात भारतात 47 लाखांपेक्षा अधिक मृत्यू झाल्याचा दावा जगतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आला आहे. मात्र कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या मोजण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने जे गणितीय मॉडेल तयार करण्यात आले आहे, ते शंकास्पद वाटत आहे. हे मॉडेल वास्तवापासून खूप दूर आहे. देशात जन्म आणि मृत्यूची नोंद ठेवणारी अत्यंत सक्षम अशी यंत्रणा कार्यरत आहे. या यंत्रणेकडून मिळालेल्या डाटानुसार आम्ही आकडेवारी जाहीर केली आहे. मग असे असताना डब्लूएचओच्या आकडेवारीमध्ये एवढी तफावत कशी आढळून आली. याचाच अर्थ जागतिक आरोग्य संघटना कोरोनामुळे झालेले मृत्यू मोजण्यासाठी ज्या गणितीय मापन पद्धतीचा उपयोग करत आहे, ती शंकास्पद आणि वास्तवापासून भरकटलेली वाटत असल्याचे भारताच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा दावा

जागतिक आरोग्य संघटनेकडून नुकतीच जगात कोरोनामुळे किती मृत्यू झाले आहेत, याची आकडेवारी जारी करण्यात आली आहे. त्यानुसार भारतात कोरोमुळे 47 लाखांपेक्षा अधिक मृत्यू झाल्याचा दावा डब्लूएचओने केला आहे. भारताने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची जी आकडेवारी जाहीर केली, त्या तूलनेत हे प्रमाण दहा पटीने अधिक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते. तसेच जगात जेवढे मृत्यू झाले त्याच्या एक तृतीयांश मृत्यू हे एकट्या भारतात झाल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आला होता. मात्र भारताकडून जागतिक आरोग्य संघटनेचा दावा फेटाळण्यात आला असून, आरोग्य संघटनेच्या गणितीय मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.