
मंगळवारी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. सिंधू जल वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. एवढंच नाही तर अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली असून, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. भारताच्या या कारवाईनंतर आता पाकिस्तानचा थयथयाट सुरू झाला आहे. आता पाकिस्तानच्या गृहमत्र्यानं युद्धाची धमकी दिली आहे.
पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भारत सिंधू पाणी वाटप करार एकतर्फी स्थगित करू शकत नाही, कारण त्याला वर्ल्ड बँक गॅरंटर आहे, असं मोहसिन नकवी यांनी म्हटलं आहे, आणि जर भारतानं सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती दिली तर आम्ही युद्धासाठी तयार आहोत असही नकवी यांनी म्हटलं आहे.
यापू्र्वी बिलावत भुट्टो यांनी देखील सिंधू नदीच्या पाणी वाटपाच्या करारावरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मी सिंधू नदीच्या काठावर उभं राहून स्पष्ट शब्दात सांगतो की सिंधू नदी आमची आहे, आणि आमचीच राहणार. या नदीमधून एकतर आमचं पाणी वाहील किंवा त्यांच्या रक्ताचे पाट वाहातील जे आमचं पाणी आमच्यापासून हिसकावतील असं भुट्टो यांनी म्हटलं होतं.
भारताची फक्त लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे सिंधू नदीचं पाणी कोणाला मिळणार हे ठरवण्याचा अधिकार त्यांना मिळत नाही. पाकिस्तानची जनता शूर आहे, आम्ही सर्व एकत्र होऊन या समस्येचा सामना करू, भारताला उत्तर देण्यासाठी आमच्या सैन्याची फौज सिमेवर सज्ज आहे, शत्रूंची नजर आमच्या पाण्यावर आहे, मात्र आमचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, संपूर्ण देश या विरोधात एकजूट होईल.
दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे, सिंधू नदीच्या जल वाटपाचा करार स्थगित करण्यात आला आहे, तसेच पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा देखील रद्द करण्यात आले आहेत. भारतात असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना पुन्हा त्यांच्या देशात परतण्याचे आदेश देण्यात आले असून, देशभरात त्यांचा शोध सुरू आहे.