
परदेशात जायचे म्हटले की तुमच्या डोक्यात महागड्या विमान प्रवासाचा विचार येत असेल. मात्र आता परदेशात जाण्यासाठी विमानप्रवासाची गरज भासणार नाही. तुम्हाला आता रेल्वेने परदेशात जाता येणार आहे. भारत आणि भूतानमधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने सोमवारी 4033 किमतीच्या दोन रेल्वे प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. यामुळे दोन्ही देशामधील संपर्क, व्यापार आणि पर्यटन वाढण्यास मदत होणार आहे. याचाच अर्थ तुम्हाला परदेशात जाण्यासाठी आता विमानप्रवासाची गरज असणार नाही. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सध्या पश्चिम बंगालमधील हासिमारा पर्यंत धावणारी रेल्वे आता भूतानमधील गेलेफूपर्यंत धावणार आहे. यासाठी आसाममधील कोक्राझार ते भूतानमधील गेलेफूपर्यंत 69 किलोमीटरचा रेल्वे मार्ग बांधला जाणार आहे. यासाठी 3456 कोटींचा खर्च येणार आहे. दुसऱ्या प्रकल्पात पश्चिम बंगालमधील बनारहाट ते भूतानमधील समत्से या दरम्यान 20 किलोमीटर लांब रेल्वे मार्ग बांधला जाणार आहे. यासाठी 577 कोटींचा खर्च येणार आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, “भारत आणि भूतानमधील संबंध मजबूत होत आहेत. भारत हा भूतानचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे, भारतीय बंदरे भूतानच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. समत्से आणि गेलेफू ही प्रमुख निर्यात-आयात केंद्र आहेत. आता भारताकडून या आर्थिक केंद्रांना चांगले कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. भूतानमध्ये बांधला जाणारा हा पहिला रेल्वे प्रकल्प आहे जो भारताला थेट जोडतो. यामुळे वाहतूक सोपी होईल, तसेच पर्यटन वाढल्यामुळे रोजगारही निर्माण होईल.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी भारत आणि भूतानमधील नवीन रेल्वे प्रकल्पाबाबत बोलताना म्हटले की, हा प्रकल्प द्विपक्षीय सामंजस्य कराराच्या माध्यमातून राबवला जात आहे. यात कोणत्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नाही. या निर्णयामुळे चीनला थेट संदेश मिळाला आहे की, भारत आणि भूतान यांच्यातील संबंध आणखी मजबूत होत आहेत. या रेल्वे मार्गांमुळे दोन्ही देशांमधील कनेक्टिव्हिटी आणि व्यापार अधिक दृढ होईल. तसेच पर्यटन वाढेल यामुळे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.