Israel attacks on Iran : इस्रायलचा इराणवर हल्ला; इकडे आता भारत मोठ्या संकटात, टेन्शन वाढलं

अखेर इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे. अमेरिका आणि इस्रायलने मिळून संयुक्तरित्या इराणवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र दुसरीकडे आता भारत देखील मोठ्या संकटात सापडला आहे.

Israel attacks on Iran : इस्रायलचा इराणवर हल्ला; इकडे आता भारत मोठ्या संकटात, टेन्शन वाढलं
Iran Israel War
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 28, 2026 | 3:00 PM

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या हल्ल्याची तयारी सुरू होती. अमेरिकेनं आधीच मध्य पूर्वेत आपलं सैन्यबळ वाढवलं होतं. जगातील सर्वात शक्तिशाली दोन युद्ध नौका मध्य पूर्वेत तैनात करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केला आहे. इराणच्या राजधानीवर अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ला करण्यात आला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू यांनी या हल्ल्याची माहिती दिली आहे. शांत इराणची निर्मिती करणं गरजेचं आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. तर या हल्ल्यांवर प्रतिक्रिया देताना सर्व उद्ध्वस्त करून टाकू असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

दरम्यान युद्ध सुरू होताच इस्रायलमध्ये देखील आणीबाणी घोषीत करण्यात आली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर आता चवताळलेल्या इराणने देखील अमेरिकेच्या काही सैन्य ठिकाणांवर हल्ला केला आहे.  बहरीनमधल्या अमेरिकन नौदलाच्या तळावर इराणकडून हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे प्रचंड तणावाचं वातावरण असून, इराणमध्ये अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय दुतावासाने इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली आहे, घराच्या बाहेर पडू नका, बातम्यांवर लक्ष ठेवा आणि पुढील सूचना मिळण्याची वाट पहा असं भारतीय दुतावासाने म्हटलं आहे. तसेच भारतीय दुतावासाकडून भारतीय नागरिकांसाठी हेल्प लाईक क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे.

भारतावर मोठं संकट

दरम्यान जर युद्धाची परिस्थिती अशीच राहिल्यास भारतासह संपूर्ण जग मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे.  जगभरात पेट्रोल, डिझेल हे प्रचंड महाग होण्याची शक्यता असून, याचा मोठा फटका हा भारताला बसणार आहे. कारण भारत कच्च्या तेलासाठी अजूनही मोठ्या प्रमाणात मध्य पूर्वेतील देशांवर अवलंबून आहे. मध्य पूर्वेत तणाव वाढल्यास इंधन सप्लायची साखळी खंडीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर इराणने स्ट्रेट ऑफ हॉरमुज बंद केला तर भारतावर मोठं इंधन संकट कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेल प्रचंड महाग होण्याची शक्यता आहे.

Follow Us