Manish Sisodia: पत्रकारिता, समाजसेवा ते राजकारण, उ. प्रदेशातल्या एका गावातून दिल्लीचे उपमुख्यमंत्री, कसा झाला मनिष सिसोदियांचा प्रवास

| Updated on: Aug 19, 2022 | 4:34 PM

न्यूयॉर्क टाईम्समध्ये दिल्लीच्या शिक्षणाच्या मॉडेलचे कौतुक करणारा लेख ज्या दिवशी छापून आला, त्यात सिलोदिया यांचा फोटोही आहे. हा लेख छापून आला त्याच दिवशी त्यांच्या सीबीआयची धाड पडली, हा एक वेगळा योगच म्हणायला हवा. भाजपा मात्र या लेखाला पेड न्यूज म्हणते आहे. मनिष सिसोदिया यांच्या एकूण कारकिर्दीवर एक नजर टाकूयात.

Manish Sisodia: पत्रकारिता, समाजसेवा ते राजकारण, उ. प्रदेशातल्या एका गावातून दिल्लीचे उपमुख्यमंत्री, कसा झाला मनिष सिसोदियांचा प्रवास
सिसोदियांचा राजकीय प्रवास
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्ली – दिल्लीतील सरकारी शाळांची प्रतिमा बदलणारा अशी त्यांची ओळख आहे. खासगी शाळांना प्रतिआव्हान देणारे म्हणूनही त्यांना ओळखले जाते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejrival)यांचे सर्वाधिक विश्वासू साथीदार म्हणूनही त्यांना ओळखले जाते. अटलबिबारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी या जोडीप्रमाणे त्यांचे नाव अरविंद केजरीवाल यांच्यासोबत घेतले जाते. तुम्ही ओळखलं असेलच, ही व्यक्ती आहे मनिष सिसोदिया. (Manish Sisodia)जे आज त्यांच्या घरी पडलेल्या सीबीआयच्या छाप्यांमुळे (CBI raids)चर्चेत आले आहेत. दिल्लीतील कथित एक्साईज भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने सिसोदिया यांच्या घरी छापेमारी केली आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये दिल्लीच्या शिक्षणाच्या मॉडेलचे कौतुक करणारा लेख ज्या दिवशी छापून आला, त्यात सिलोदिया यांचा फोटोही आहे. हा लेख छापून आला त्याच दिवशी त्यांच्या सीबीआयची धाड पडली, हा एक वेगळा योगच म्हणायला हवा. भाजपा मात्र या लेखाला पेड न्यूज म्हणते आहे. मनिष सिसोदिया यांच्या एकूण कारकिर्दीवर एक नजर टाकूयात.

उ. प्रदेश ते दिल्लीतील पत्रकारिता

उ. प्रदेशातील हाडुप या गावातून सुरु केलेला मनिष सिसोदिया यांचा प्रवास दिल्लीच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेला आहे. त्यांचा जन्म हाडुप जिल्ह्यात फगौता गावात झाला. त्यांचे वडील शाळेतील शिक्षक होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या गावातील सरकारी शाळेत झाले. लेखणीने समाज बदलण्याच्या प्रेरणेने ते पत्रकारितेत शिरले. 1993 साली त्यांनी भारतीय विद्या भवनातून मास कम्युनिकेशनचा डिप्लोमा पूर्ण केला. 1996  साली त्यांनी आकाशवाणीवरील झीरो अवर्स या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यानंतर त्यांनी टीव्ही पत्रकारितेत प्रवेश केला. 1997 ते 2005  या सालापर्यंत ते झी न्यूजमध्ये कार्यरत होते.

केजरीवाल ते अण्णा हजारे आंदोलन

या पत्रकारितेच्या दिवसांत त्यांचा संपर्क अरविंद केजरीवाल यांच्याशी झाला. त्यावेळी केजरीवाल हे आयआरएसची नोकरी सोडून समाजसेवेच्या क्षेत्रात उतरले होते. भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी मोहीम चालवली होती. या दोघांमध्ये चांगले मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाल्यानंतर सिसोदिया केजरीवाल यांच्या परिवर्तन या एनजीओशी जोडले गेले. 2005 साली पत्रकारिता सोडल्यानंतर, सिसोदिया यांनी केजरीवाल यांच्यासोबत कबीर नावाची एक संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून सरकारी अधिकारी आणि जनता यांच्यातील संवाद वाढवण्याचा आणि लोकांच्या समस्या दूर करण्यात मदत करण्यात येत होती. कबीरच्या माध्यमनातून त्यांनी माहिती अधिकाराची मागणी बुलंद केली. ज्यावेळी माहिती अधिकार कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला, त्यावेळी अरुणा रॉय यांनी ज्या 9 जणांची निवड केली होती, त्यात सिसोदिया यांचा समावेश होता. सिसोदिया आणि केजरीवाल यांनी 2006 साली पब्लिक कॉझ रिसर्च फाऊंडेशनची सुरुवात केली. दोघेही एकत्र सामाजिक चळवळीच्या दिशेने प्रवास करीत होते. 2011 साली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात मनिष सिसोदिया यांनी प्रमुख भूमिका निभावली. ते त्यावेळी अण्णांच्या कोअर टीममध्ये होते.

हे सुद्धा वाचा

राजकीय कारकीर्द

2012 साली त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी नावाच्या एका राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली. त्या पक्षाचे सिसोदिया हे संस्थापक सदस्य आहेत. त्यावेळी ही जोडी एक दिवस देशाचे राजकारण बदलेल, असे फारसे कुणाला वाटत नव्हते. 2013 साली दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत या नव्या पक्षाने 28 जागा जिंकत राजकीय पंडितांना पहिला धक्का दिला. दिल्लीच्या राजकारमआतील शीला दीक्षित युग संपवण्याचे श्रेय आपकडे जाते. त्यावेळी काँग्रेसला केवळ 8 जागा मिळाल्या तर भाजपाला 31 . पटपडगंज मतदारसंघातून निवडून आलेले आमदार सिसोदिया पहिल्यांदा दिल्ली विधानसभेचे पायरी चढले. केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले आणि सिसोदिया त्यांच्या कॅबिनेटचे मंत्री. मात्र 49  दिवसांतच हे सरकार पडले.

उपमुख्यमंत्री सिसोदिया

2015 साली दिल्लीत पुन्हा विधानसभा निवडणुका झाल्या.त्यात आपने ऐतिहासिक कामगिरी केली. 70 पैकी 67 जागा आपने जिंकल्या. काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाला केवळ 3 जागा मिळवता आल्या. प्रचंड बहुमताने केजरीवाल मुख्यमंत्री झाले तर सिसोदिया उपमुख्यमंत्री. शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी दिल्लीत सरकारी शाळांमध्ये मोठे बदल केले. त्यांचे शिक्षण मॉडेल प्रचंड हिट झाले. 2020 सालच्या निवडणुकीतही आपने भरघोस यश मिळवले. आता हेच सिसोदिया कथित एक्साईज पॉलिसी घोटाळा प्रकरणात केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आहेत.