भर रस्त्यात मेलेल्या बकऱ्यांची लूटालूट… बकऱ्या घेऊन जाणारा ट्रक पलटी होताच नागरिकांची एकच झुंबड
कौशांबीतील भीषण अपघातानंतर मानवतेलाच काळिमा फासणारा प्रकार समोर, मदतीऐवजी लोकांनी बकऱ्या उचलून नेल्याचा व्हिडीओ व्हायरल.

Viral video: उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात घडलेल्या एका भीषण अपघाताने सध्या संपूर्ण देशभरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. एका बाजूला वेगवान आणि बेफिकीर वाहनचालकामुळे मोठा रस्ता अपघात झाला तर दुसऱ्या बाजूला अपघातानंतर काही लोकांनी दाखवलेल्या अमानवी वर्तनामुळे समाजमन हादरून गेले आहे. बकऱ्यांनी भरलेला एक ट्रक महामार्गावर उलटल्याने अनेक जण जखमी झाले आणि डझनभर बकऱ्यांचा मृत्यू झाला. मात्र या दुर्घटनेनंतर मदत करण्याऐवजी काही लोक बकऱ्या उचलून घेऊन जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी दुपारी सुमारे 2.30 वाजण्याच्या सुमारास कौशांबी जिल्ह्यातील कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंदावा टेढी मोड परिसरात घडला. संबंधित ट्रक कानपूरहून प्रयागराजकडे जात होता. ट्रकमध्ये 200 हून अधिक बकऱ्या भरलेल्या होत्या. प्रवासादरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक अचानक रस्त्याच्या कडेला पलटी झाला.
लोकांकडून बकऱ्यांची लूट
अपघात इतका भीषण होता की ट्रकमधील काही लोक आतमध्येच अडकून पडले, तर अनेक बकऱ्या रस्त्यावर विखुरल्या गेल्या. काही बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक गंभीर जखमी झाल्या. अपघातामुळे परिसरात मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.
अपघाताची माहिती मिळताच आसपासचे नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. मात्र जखमींना मदत करण्याऐवजी काही लोकांनी बकऱ्या उचलून नेण्यास सुरुवात केल्याचे समोर आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही जण खांद्यावर बकऱ्या घेऊन जाताना तर काही जण त्यांना पकडून घटनास्थळावरून निघून जाताना दिसत आहेत. या दृश्यामुळे मानवतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अत्यंत लाजिरवाणा प्रकार
घटनेची माहिती मिळताच कोखराज पोलीस आणि शाहजादपूर चौकीचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने ट्रकमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेद्वारे त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने पलटलेला ट्रक हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. तसेच जिवंत बचावलेल्या बकऱ्यांनाही सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले.
बकरियों का ट्रक पलटने के बाद लोगों ने मदद करने के बजाए मुर्दा बकरे बकरियों को लूटना शुरू कर दिया…ये वही लोग हैं जो मुसलमानों को बकरा खाने पर ज्ञान देते हैं. pic.twitter.com/Igxi86Ma7A
— आजाद भारत का आजाद नागरिक (@AnathNagrik) May 24, 2026
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्याऐवजी लोक लूटमार करण्यात व्यस्त होते अशी संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. काहींनी या प्रकाराला अत्यंत लाजिरवाणे म्हटले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.