ठाकरेंना जे जमलं नाही ते आता ममता बॅनर्जी करून दाखवणार? बंडखोर खासदारांच्या अडचणी वाढल्या, तृणमूलच्या गोटातून सर्वात मोठी बातमी
काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं, तब्बल 20 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली. मात्र आता या बंडखोर खासदारांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.

तृणमूल काँग्रेस (TMC) च्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा मोठा पराभव झाला तर दुसरीकडे या निवडणुकीत भाजपने दणदणीत यश मिळून सत्ता स्थापन केली. दरम्यान विधानसभा निवडणुकीत तृणमूलचा पराभव झाल्यानंतर या पक्षाला पक्षफुटीचं ग्रहण लागलं. तब्बल 58 आमदारांनी पक्षातून बंडखोरी केली, त्यांनी वेगळा गट स्थापन केला, विधानसभा अध्यक्षांनी या आमदारांच्या गटाला परवानगी देखील दिली, त्यानंतर वीस खासदारांनी पक्षातून बंडखोरी करत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. ममता बॅनर्जी यांच्यासाठी राज्यात झालेल्या पराभवापेक्षाही हे दोन मोठे धक्के होते. दरम्यान आता या तृणमूलच्या वीस बंडखोर खासदारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या सर्व खासदारांना बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर नोटीस पाठवली आहे. या सर्व खासदारांना सात दिवसांच्या आत उत्तर देण्याचे आदेश लोकसभा अध्यक्षांकडून देण्यात आले आहेत. तृणमूलचे खासदार आणि पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या बंडखोर खासदारांच्या अपात्रेविषयक एका प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या सर्व खासदारांना ही नोटीस पाठवली आहे. दरम्यान दुसरीकडे या प्रकरणात अभिषेक बॅनर्जी यांनी सुप्रीम कोर्टात देखील एक याचिका दाखल केली आहे. सुनावणीदरम्यान अभिषेक बॅनर्जी यांनी ओम बिर्ला यांच्यावर आरोप केला होता की, या प्रकरणावर लोकसभा अध्यक्षांकडून वेळेत निर्णय घेतला जात नाहीये. त्यानंतर मंगळवारी सुप्रीम कोर्टाकडून या संदर्भात खासदारांना पाठवण्यात आलेल्या नोटीसीसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, त्यानंतर आता लोकसभा अध्यक्षांकडून या सर्व खासदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
दरम्यान अशीच फूट उद्धव ठाकरे यांच्या पक्षात शिवसेना ठाकरे गटात देखील पडली आहे, 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांकडून या प्रक्ष प्रवेशाला अधिकृत मान्यता देण्यात आली, उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला. परंतु तृणमूलमधून जे वीस खासदार बाहेर पडले, त्यांचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे, आणि आता तर या सर्व खासदारांना नोटीस देखील पाठवण्यात आली आहे, त्यामुळे ममता बॅनर्जी या गेम फिरवण्यात यशस्वी होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.