Tukaram Mundhe: सुट्या तेलावर तुकाराम मुंढेंचा कडक निर्णय, अखेर मुख्यमंत्र्यांना करावा लागला हस्तक्षेप; फडणवीस म्हणाले..
Tukaram Mundhe: राज्यात सुट्या तेलाच्या विक्रीवर एफडीएनं बंदी घातल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्य मंत्रिमंडळात उमटले. आयुक्त तुकाराम मुंढे यांचा हा निर्णय तेल उत्पादक आणि छोट्या व्यापाऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप काही मंत्र्यांनी केला.

महाराष्ट्रात अन्न सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमकपणे कारवाई करणारे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर कठोर निर्बंध लागू करण्याच्या एफडीएच्या निर्णयानंतर व्यापारी आणि लहान विक्रेत्यांकडून चिंता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत ग्राहकांच्या सुरक्षिततेसोबत तेल व्यापाऱ्यांच्या हिताचाही वितार करण्यासाठी एसओपी (SOP) तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
सुट्या तेलाच्या विक्रीवर मुंढेंचे आदेश
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत मोठी मोहीम सुरू आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून सुट्या किंवा पॅकिंगशिवाय विकल्या जाणाऱ्या खाद्यतेलावर कारवाई करण्यात आली. एफडीएने अशा तेलाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी राज्यव्यापी आदेश जारी केला होता. सुट्या तेलाचा स्रोत, गुणवत्ता आणि त्यात भेसळ झाली आहे की नाही याची खात्री करणं ग्राहकांसाठी कठीण असतं. तपासणीदरम्यान चुकीचं लेबलिंग, तेलात स्वस्त तेलांची भेसळ, परवान्याशिवाय व्यवसाय आणि अयोग्य पद्धतीने तेलाची साठवणूक अशा बाबी आढळल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी मागितला मध्यम मार्ग
सुट्या तेलावरील कठोर कारवाईमुळे व्यापारी वर्गात निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. खाद्यतेलातील भेसळ रोखण्यासाठी एफडीएने SOP तयार करावी, मात्र त्याचवेळी पारंपरिक तेल व्यापार आणि छोट्या विक्रेत्यांवर अनावश्यक परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील एफडीएला मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश दिले, जेणेकरून अन्न सुरक्षेची काळजी घेतानाच कायदेशीर व्यवसाय सुरू राहतील. “खाद्यतेलाची गुणवत्ता सुनिश्चित करणारी आणि भेसळ रोखणारी, तसंच पारंपरिक व्यवसायांना सुरू ठेवण्याची परवानगी देणारी एसओपी तयार करून मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश आम्ही एफडीएला देऊ. या व्यवसायांना बंद करण्यास भाग न पाडता सुटे तेल भेसळयुक्त राहील हे सुनिश्चित करणं, हा यामागील उद्देश आहे”, असं फडणवीस बैठकीनंतर म्हणाले.
भेसळीविरोधात कारवाई सुरूच
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील एफडीएची अन्न सुरक्षेविरोधातील मोहीम थांबलेली नाही. मुंबई आणि राज्यातील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यवसायांवर तपासण्या सुरू असून अस्वच्छता, कालबाह्य खाद्यपदार्थ आणि इतर नियमभंग आढळल्यास कारवाई केली जात आहे. एफडीएने वारंवर गरम केलेल्या तेलाच्या वापराबाबतही चिंता व्यक्त केली आहे. अशा तेलामुळे आरोग्यासाठी हानिकारक घटक वाढू शकतात, त्यामुळे खाद्य व्यवसायांनी नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं.
